मुंबई - पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार असून, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. या मतदारसंघात उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे मत विचारात घेऊन, अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले आहे. तसेच या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या वतीने पार्थ यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या बातम्या माध्यमांनी प्रसारीत करू नये, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी विचारविनिमय करूनच निर्णय
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहेत. या बातम्यांना कोणताही आधार नाही. भालकेंचे निधन हा आमच्यासाठी मोठा धक्का असून, स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी विचारविनिमय करूनच उमेदवार ठरवू असे यावेळी अजित पवार यांनी म्हंटले आहे.
महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होईल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरवण्याचा निर्णय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व उमेदवार निवड समितीच्या माध्यमातून घेण्यात येईल. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ही पहिलीच विधानसभा पोटनिवडणूक असून, महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला आहे.