मुंबई - मालाड येथील एका उद्यानाला टिपू सुलतान (Tipu Sultan Garden Name) यांचे नाव देण्यावरून शिवसेना व भाजप (Shivsena Vs BJP) कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी झाली. अशातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aaditya Thackeray) यांच्या विधानाने आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अशा प्रकारचा प्रस्तावच पालिकेत आला नसल्याचे महापौरांनी याअगोदर स्पष्ट केले आहे, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
- प्रस्तावच नाही तर नाव कसं?
मुंबई उपनगरातील मालाड हा विभाग मुंबईचे पालकमंत्री तसेच काँग्रेस नेते अस्लम शेख यांचा मतदारसंघ आहे. या विभागात असलेल्या उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यावरून सध्या वातावरण तापले असताना शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अशाप्रसंगी जर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी असे सांगितले आहे की अशा पद्धतीचा प्रस्तावाच महापालिकेकडे आला नाही, मग हे नाव कशा पद्धतीने व कोणी दिलं? हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. तर दुसरीकडे भाजप नेते या सर्व प्रश्नांसाठी शिवसेनेला जबाबदार धरत आहेत.
हेही वाचा - Tipu Sultan Stadium : टिपू सुलतान क्रीडांगण नामकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजप, बजरंग दलाची निदर्शने
- शिवसैनिकांना रस्त्यावर उतरायची गरज काय?
भाजप आमदार राम कदम यांनी सांगितले आहे की, टिपू सुलतान यांच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मालाड येथील उद्यानाला देण्यात यावे. परंतु, राज्यात शिवसेनेचे सरकार असताना विशेष करून मुख्यमंत्री शिवसेनेचा असतानासुद्धा शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तेसुद्धा टिपू सुलतान यांच्या नावाला विरोध करत आहेत. मुख्यमंत्री यांनी ठरवले तर ते दोन मिनिटांमध्ये हे करू शकतात व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरायची गरज पडणार नाही. परंतु सत्तेच्या मोहापोटी ते असे करण्यापासून दूर राहतात, असा आरोपही राम कदम यांनी केला आहे. शिवसेना लोकांच्या डोळ्यात धूळफेक करत आहे व छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानही करत आहे, असेही राम कदम यांनी सांगितले आहे. टिपू सुलतान यांच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यायला अडचण काय आहे? असा प्रश्नही राम कदम यांनी उपस्थित केला आहे
- उद्धव ठाकरेंना हे मान्य आहे का?
उद्यान महाराष्ट्र शासनाचे, कार्यक्रम मुंबईच्या पालकमंत्र्यांचा? नामकरणाचा कुठलाही ठराव नाही? नामकरणाला कोणाचीही मान्यता नाही, मग हे नामकरण कसे होत आहे? ही मोगलाई आहे काय? हिंदूंची कत्तल करणाऱ्यांचा उदोउदो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? की, ते मतांच्या लाचारीसाठी चिडीचूप आहेत का? असा सवाल स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.