मुंबई - मालेगावच्या महापौर ताहिरा शेख यांच्यासह 28 नगरसेवकांनी ( Malegaon Congress corporators joined Nationalist Congress Party ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत ( Malegaon Corporators Joins NCP ) प्रवेश केला. यावेळी अजित पवार यांनी राज्यात तीन पक्षांची मिळून आघाडीचे सरकार असले तरी आपल्याला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत आहे. तसेच ते यावेळी म्हणाले की, राज्यात मुंबई मलाड देखील क्रीडांगणाला टिपू सुलतान त्यांचे नाव देण्याच्या मुद्यावरून भाजपा आक्रमक झाली आहे. टिपू सुलतानचे नाव हे हिंदू विरोधी असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला. या विरोधात भारतीय जनता पक्षाने आंदोलनही केले. मात्र भाजप करत असलेल्या आरोपांत काही तथ्य नाही. निवडणुका आल्या की, काही पक्ष समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला लगावलाय.
मुंबईच्या महापौरांनी याबाबत सत्य समोर आणले -
भारतीय जनता पक्ष आता टिपू सुलतान यांच्या नावाला आज विरोध करत असला तरी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कागदोपत्री पुरावा समोर आणला आहे. यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या काही नगरसेवकांनी रस्त्याला टिपू सुलतान यांचे नाव द्यावे यासाठीचा प्रस्ताव केला होता. त्यामुळे भाजप आता केवळ राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही यावेळी अजित पवार म्हणाले. तसेच टिपू सुलतान नामकरणाचा मुद्दा हा अति महत्त्वाचा नसून यापेक्षाही अधिक ज्वलंत प्रश्न राज्यात समोर उभे आहेत. त्या प्रश्नांकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवे असा सल्लाही अजित पवार यांनी यावेळी दिला.
अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याला शिवसेनेने उत्तर दिले -
शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यामधील ब्रिज नितीन गडकरी हेच बांधू शकतात. असे वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली होती. मात्र अब्दुल सत्तार यांनी यां आधी देखील शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या युतीबाबत वक्तव्य केली होती. या वक्तव्याला शिवसेना नेत्यांकडून उत्तर देण्यात आले असून याबाबत आघाडीमध्ये इतर पक्षांनी उत्तर देण्याची गरज नसल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.
कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही -
संतोष परब यांना मारहाण प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला नाही. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, कोर्टाने काय निर्णय घ्यायचा हा कोर्टाचा अधिकार आहे. मात्र कायद्यासमोर कोणीही मोठे नाही असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.