मुंबई - घाटकोपर पूर्व येथील रसिकलाल सकलचंद ज्वेलर्सला सध्या टाळे लागल्याचे दिसत आहे. या ज्वेलर्सने ग्राहकांकडून पैसे घेऊन विविध योजना जाहीर केल्या होत्या. मात्र, ग्राहकांना पैसे किंवा लाभ दोन्हीपैकी काहीही न मिळाल्याने पंतनगर पोलीस ठाण्यात ज्वेलर्सविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही फसवणूक 300 कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती मिळाली आहे.
रसिकलाल सकलचंद ज्वेलर्सने ग्राहकांकडून ठेवी स्वीकारून विविध लाभ देण्याचे जाहीर केले होते. यानुसार, ग्राहकांना लाभ न दिल्याने ग्राहक त्रस्त होते. त्यातच दुकान चार-पाच दिवस बंद राहिल्याने ज्वेलर्सचे दिवाळे निघाल्याचे संदेश समाज माध्यमांवर पसरले. यामुळे ग्राहकांनी दुकानदाराकडे आपल्या ठेवी परत मिळवण्यासाठी तगादा लावला होता. परंतु, ग्राहकांचे पैसे परत मिळाले नाही. यात स्थानिक आमदार भाजपचे पराग शहा, खासदार मनोज कोटक यांनी देखील मध्यस्थी करून ग्राहकांना पैसे परत मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोडगा निघाला नाही. अखेर ग्राहकांनी पंतनगर पोलीस ठाण्यात या ज्वेलर्सच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ऐन दिवाळीत गुडवीन ज्वेलर्सच्या दुकानाला टाळे लागल्याचे प्रकरण ताजे असतानाच हे दुसरे प्रकरण समोर आले आहे.