मुंबई: एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. फडणवीस आणि शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केले. दहा दिवसांपासून हा सत्तासंघर्ष सुरू होता. शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी राजीनामा दिला. त्यानंतर आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील अशीच शक्यता वर्तवण्यात येत असताना ही घोषना झाली. अनेक कारणासाठी शिंदेच्या रुपाने भाजपला ब्रम्हास्त्र मिळाले आहे.
मराठी अस्मितेचे कार्ड: बंडाच्या काळात शिवसेना विशेषत: संजय राऊत हे बंडखोरां सोबतच भाजपवर जोरदार टीका करत होते. यावेळी त्यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा काढत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे मराठीचा द्वेश करतात असे भासवले होते. त्याच बरोबर शिंदेंच्या बंडामुळे सर्वसामान्य जनता आणि शिवसैनिक आणि पदाधीकारी तसेच आजही उद्धव ठाकरेंचे नेतृत्व मानत असलेल्यां मधे शिवसेने बाबत मोठी सहानुभुती निर्माण होईल आणि त्याचा फटका भाजपला आगामी काळात बसू नये याची काळजी घेत भाजपने शिंदेंच्या रुपाने एक कार्ड समोर केल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे मराठी अस्मितेसह आगामी काळात शिवसेनेला सहानुभुती मिळुनये ही खेळी साध्य केली आहे.
शहांना खोटे ठरवल्याचा वचपा: शिवसेना आणि भाजपने युतीत निवडणुक लढली आणि बहुमताच्या आकडाही पार केला. पण शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला. सरकार आल्यानंतर शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिले जाईल असे अश्वासन गृहमंत्री अमीत शहा यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत बसुन दिल्याचा दावा शिवसेनेने केला होता. आणि याच गोष्टीचा वारंवार पुर्नउच्चार करत शहां आणि भाजपला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला. भाजपला या प्रकाराचा मोठा राग होता. शिवसेनेचा वचपा काढण्याची संधी साधत भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्री पद बहाल केल्याचे सांगितले जात आहे
शिंदेंच्या बंडांत शिवसेनेचा मोठा वाटा : भाजपला सत्तेत येण्यासाठी सुमारे 25 आमदारांच्या गटाची आवश्यकता होती. शिंदेंच्या बंडात मात्र 50 च्यावर आमदार सहभागी झाले. एवढ्या सगळ्यांना सामाऊन घेणे आणि त्यांना सत्तेचा वाटा देणे या प्रक्रियेत पुन्हा नाराजांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नव्हती उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीला झटका देताना पुन्हा नाराजीनाट्याचा घोळ होऊ नये याची पुरेपुर काळजी घेत भाजपने एक नवा डाव आखला आणि शिंदेंना मुख्यमंत्री पद देत सगळ्यांनाच धक्का दिल्याचे मानले जात आहे.
मुंबई पालीका निवडणुक: मुंबई सह महाराष्ट्रातील अनेक महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यातुन हिसकावण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्याची तयारीही आधिच सुरु झालेली आहे. येत्या निवडणुकीत शिंदे यांच्या रुपाने शिवसेनेची ताकद आपल्याकडे वळवण्यासाठी आणि सत्तेच्या या घडामोडीचा शिवसेनेला फायदा होऊ नये हे पाहता भाजपने शिंदेंना मुख्यमंत्री पदासह बाहेरुन पाठिंबा देत सरकारच ताब्यात दिल्याचा फायदा महापालिकेच्या निवडणुकांत होउ शकतो हे पाहता भाजपने ही खेळी खेळल्याचे जाणकारांचे मत आहे.
शिवसेनेच्या मतांच्या विभागणीचा प्रयत्न: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये खरी शिवसेना कोणाची आणि मोठी शिवसेना कोणाची हा प्रश्न निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले गेले असावे. यानिमित्ताने शिवसेनेत फूट पडली असून आता मतांची विभागणी निश्चित होईल आणि त्याचा फायदा आगामी निवडणुकीत भाजपाला मिळू भाजपा स्वबळावर सत्तेत येऊ शकते असा प्रयत्न यानिमित्त नही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. - भारतकुमार राऊत, माजी खासदार
एकाच दगडात बरेच पक्षी : भाजपने एकाच दगडात बरेच पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः शिवसेनेला मंत्रिपद देऊन उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव टाकला आहे. आगामी महानगर पालिकांसह इतर निवडणुकांमध्ये भाजपला मोठ जनमत मिळवण्यासाठी मोठी खेळी खेळली आहे. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकांमध्ये भाजप वरचढं करायचा आणि एक हाती सत्ता घेण्यासाठी ही खेळी खेळली असून भविष्यात याचा मोठा फटका शिवसेनेला बसणार आहे. तर यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय वजन वाढले आहे - सुधीर गव्हाणे, राजकीय विश्लेषक
भाजपचे बेरजेचे राजकारण: शहा यांनी शब्द दिल्याचे प्रत्युत्तर देत त्या विषयाची जखम भरुन काढताना भाजपने शिंदेंना सत्ता देत बेरजेचे राजकारण खेळले आहे. शिवसेनेचा मतदार भाजप पासून दुर जाऊ नयेत याची काळजी घेतली आहे. लोकसभा निवडणूक 2 वर्षावर आली आहे. यावेळी शिवसेने सोबत युती होण्याची शक्यता नाही. युतीचा मतदार हातात रहवा याची काळजी घेण्यात आली आहे. शिंदे यांचीच शिवसेना खरी आहे हे भासवण्याचा प्रयत्न होईल आणि युती नसली तरी शिवसेनेचा मतदार हातचा जाऊ नये याची काळजी घेतली आहे - डाॅ. अनिल फळे, राजकीय विश्लेषक, पत्रकार
शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान: एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देऊन शिवसेनेला संपवण्याचा डाव देवेंद्र फडणवीस यांनी आखला आहे ही शरद पवार यांच्यासारखी चाल झाली. शरद पवार यांच्या प्रमाणेच आपणही राज्याचे मोठे नेतृत्व आहोत हे या खेळीतून त्यांना दाखवायचे आहे विशेष म्हणजे त्यांना मुख्यमंत्री करून उद्धव ठाकरे पेक्षा मोठे किंवा उद्धव ठाकरे यांच्या पंक्तीत नेऊन देवेंद्र फडणवीस यांनी बसवले आहे यामुळे उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते नाही हे दाखवण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला आहे. - अनिकेत जोशी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक
मोठेपण येण्याचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देऊन स्वतःकडे मोठेपण घेण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा मोह नाही असे सांगत जनतेमध्ये भावनिक वातावरण निर्माण केले त्याचप्रमाणे 'आपण पुन्हा येईल' म्हटले तरी आपल्यालाही मुख्यमंत्री पदाचा मोह नाही. आपल्याला पक्षाचे आणि राज्याचे हित महत्त्वाचे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या निमित्ताने फडणवीस यांनी केला आहे. तसेच या संपूर्ण राजकीय अनागोंदीला केवळ शिवसेना आणि शिंदे गट जबाबदार आहे. यात भाजपाची काहीही चूक नाही हे दाखवून शिंदे यांना खलनायक म्हणून उभे करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याची शक्यता निर्माण झाली आहे - रवींद्र आंबेकर, विश्लेषक
शरद पवार यांच्या व्यूहरचनेचा वापर : एकनाथ शिंदे यांचे यांच्या मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात शिवसेनेचे नामोनिशन मिटवणे हा भाजपचा उद्देश आहे. हिंदू मतं आपल्या पदरात कशी पडतील, यासाठी भाजपचे प्रयत्न आहे. त्यामुळे शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. ज्यांच्यावर केंद्रीय तपासणी त्यांच्या कारवाया सुरू आहेत अशीच लोक शिंदे यांच्या पाठीशी आहेत. शिवसेनेवर याचा फारसा परिणाम शिवसेनेवर होणार नाही. 2019 मध्ये भाजप शिवसेना युती मुख्यमंत्री पदावरूनच तुटली होती हाच निर्णय यापूर्वी घेतला असता तर महाविकास आघाडी ऐवजी शिवसेना आणि भाजपची सत्ता राहिली असती परंतु शिवसेनेला नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न असल्याने असे प्रकार सुरू झाले आहेत. - विजय घोरपडे, राजकीय विश्लेषक, पत्रकार