मुंबई - मूळ पाकिस्तानी गायक अदनान सामी यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. याबद्दल अनेक पक्ष आणि नेत्यांनी नापसंती दाखवली आहे. याबाबत भाजप आमदार यांनी आपली प्रतिक्रिया देताना, अदनान सामी यांना भारताचे नागरिकत्व देताना कोणीही विरोध केला नाही. मग आता पुरस्कार देताना विरोध का करतायत, असा प्रश्न केला आहे.
हेही वाचा...अदनान सामीच्या 'पद्मश्री' पुरस्काराला मनसेचा विरोध, पुढील कार्यक्रम उधळण्याचा इशारा
अदनान सामीने भारतात कमावलेला पैसा दुबईमार्गे पाकिस्तानात पाठवला. त्यामुळे त्याचा गौरव करणारे आपणच आपले मारेकरी आहोत, अशी टीका मनसे नेते अमेय खोपकर यांनी केली होती. तसेच अदनान सामीला पुरस्कार देण्यावर आक्षेप घेतला होता. यावर आता भाजपने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप आमदार राम कदम यांनी आपली भूमिका व्यक्त करताना अदनान सामीच्या कार्याचा उल्लेख केला. सामीने मागील काही वर्षात मोठे काम केले. त्यामुळे त्याला हा पुरस्कार दिला आहे. अदनान सामीने सांगितल्यानुसार तो गेले 16 वर्ष भारतात राहतो. अदनान सामींना राष्ट्रपती पुरस्कार दिल्यामुळे काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. आक्षेप जर घ्यायचाच होता तर त्यांना भारताचे नागरिकत्व दिले तेव्हा आक्षेप घ्यायचा होता. तेव्हा मात्र कोणी आक्षेप घेतला नाही मग आता पुरस्काराच्या वेळी आक्षेप कशाला, असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला.
हेही वाचा... राष्ट्रवादी म्हणते.. अदनान सामी यांना पुरस्कार देऊन देशाचा अपमान
अदनान यांनी भारताचे नागरिकत्व स्वीकारले. त्यानंतर त्यांनी चांगले कार्य केले. म्हणून त्यांना पुरस्कार दिला गेला, यात काय चूक आहे. भाजपला काही पक्ष मुस्लिम विरोधी समजत होते. मात्र, खऱ्या अर्थाने मुस्लीम समाजाला न्याय हा भाजपनेच दिला आहे. कारण, पुरस्कार देताना जात धर्म पाहिले जात नाही. अदनान हे भारतीय आहेत त्यांचे कार्य चांगले, म्हणून त्यांना पुरस्कार दिला, असे भाजप आमदार राम कदम यांनी म्हटले आहे.