मुंबई - विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांविषयी भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात जाऊन भेट घेतली. सरासरी गुण देण्याचा निर्णय सर्वसमावेशक विचार करून झाला का? तरुणांच्या माथी ‘जळीत बीए’प्रमाणे ‘कोरोना ग्रॅज्युएट’ बिरुदावली लागणार का? पदवी अंतिम वर्षाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात अजूनही शंका आहेत, अशा प्रश्नांकडे त्यांनी राज्यपालांचे लक्ष वेधले.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांविषयी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल (सोमवार) पत्र पाठवले आहे. पदवीची अंतिम वर्षाची परीक्षा न घेता सरासरी गुण देणे, गुणसुधार कार्यक्रमात ऐच्छिक गुण देऊन तीन महिन्यांनंतर त्यांची परीक्षा घेण्याचा जो निर्णय घेतला, तो सर्वसमावेशक विचार करून घेला का? राज्यातील सर्व विद्यापीठे मिळून एटीकेटी (ATKT) असलेल्या 40 टक्के विद्यार्थ्यांचे काय? प्रथम व व्दितीय वर्षात एटीकेटी असल्याने त्यांना नापास करणार का? असे बरेच प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत.
पूर्वी एकदा विद्यापीठाच्या उत्तर पत्रिका असलेल्या खोलीला आग लागल्याने त्यावर्षी सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक करिअरला ‘जळीत बीए’ असे म्हटले होते. तसे दुर्दैवाने आता ‘कोरोना ग्रॅज्युएट’ म्हणावे लागणार का? यासह विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा विचार होणे आवश्यक आहे. यासाठी आज आपण राज्यपालांची भेट घेतल्याचे शेलार यांनी सांगितले. पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना विविध प्रश्नांनी घेरले असून ते आपल्या शैक्षणिक करिअरबाबत भयभीत झाले आहेत. त्यामुळे कुलपतींनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची योग्यवेळी दखल घेऊन त्यांना चिंतामुक्त करावे, अशी विनंती करण्यासाठी आपण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटलो, असे भेटीनंतर शेलारांनी स्पष्ट केले.