मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश सुरू असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. यावर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत, आमचं खत चांगलं आहे; त्यामुळे महाराष्ट्र्र हिरवागार आणि भगवा होणार, अशी प्रतिक्रिया देऊन शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य ठाकरेंच्या हस्ते रविवारी अंधेरीतील मरोळमध्ये पालिकेच्या मैदानात झाडे लावण्याचा कार्यक्रम पार पडला. युवासेना प्रमूख आदित्य ठाकरे यांच्यासोबत 1100 नागरिकांच्या हस्ते एकाच वेळी अकराशे झाडे लावण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता. आज मी लावलेले हे विकासाचे झाड आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. आमचं खत सगळीकडे चांगलं असून, पावसाचे इनकमिंग होऊ दे, असं त्यांनी म्हटलंय.
एका खासगी वृत्तपत्राने केलेल्या सर्व्हेवर बोलताना, माझा सर्व्हेवर विश्वास नाही. आम्ही काम करून जनतेचे आशीर्वाद घेत फिरतो. जेव्हा सत्ता असते तेव्हा लोकांची कामे करणं गरजेच असतं, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे प्रमाण वाढले आहे. तसेच सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात फोडाफोडी होत आहे. नेते फोडण्यासाठी सरकारी संस्थांचा वापर करण्यात येत असून, विरोधी आमदारांना ईडीद्वारे धमकावले जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता. तसेच स्वत: मुख्यमंत्री आमदारांना फोन करत आहेत, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला होता.