कोल्हापूर - गेल्या एक आठवड्यापासून युक्रेन आणि रशियामध्ये महायुद्ध पेटले (Russia Ukraine War) आहे. तर या महायुद्धात अनेक भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत. यात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू (Two Indian Dies in Ukraine) झाला आहे. त्यामुळे पालकही चिंतेत आहेत. मात्र, या सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार युक्रेनच्या आजूबाजूच्या देशातून एअरलिफ्ट करत आहे. युक्रेनच्या आणि रशियाच्या जवळच्या सीमेवर पोलंड (Poland) देशाची सीमा आहे. तसेच 1943 पासून पोलंड आणि कोल्हापूरचे एक खास ऋणानुबंध (Kolhapur-Poland Relation) आहेत. या ऋणानुबंधांचे अनेक पुरावे कोल्हापुरात आहेत. याच मैत्रीपूर्ण संबंधांचा दाखला देत कोल्हापूरच्या एका युवकाने पोलंडच्या राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहित युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मदत करण्याची आणि आश्रय देण्याची विनंती केली आहे.
कोल्हापूरच्या युवकांनी लिहिले पोलंडच्या राष्ट्राध्यक्षांना पत्र:
युक्रेन आणि रशिया यांच्या जवळच्या देशांच्या बॉर्डरमध्ये पोलंड हा देश अग्रक्रमाने येतो. 1942 साली झालेल्या दुसऱ्या महायुद्धात पोलंडची (Kolhapur residents remind Poland of WWII help) अवस्था प्रचंड बिकट झाली होती. यावेळी हजारो पोलंडवासीयांनी देश सोडून जिथे मिळेल तिथे आश्रय घेतला. त्यापैकीच 5 हजार पोलंड नागरिकांना कोल्हापूरकरांनी म्हणजेच त्याकाळचा करवीर संस्थांनी आश्रय दिला. वळीवडे या गावात त्यांच्यासाठी एक छावणी देखील उभी करण्यात आली होती. तेव्हापासून कोल्हापूर आणि पोलंडचे संबंध हे मैत्रीपूर्ण बनले.
सध्या युक्रेनच्या वेशीला पोलंड देश आहे. तसेच कोल्हापुरातील महावीर गार्डन येथे दोन देशांमधील आठवणी सांगणाऱ्या स्मृतीस्तंभ देखील असून यावर छावणीचा नकाशाही काढण्यात आला आहे. तसेच पोलंडवासियांचे निधन झाल्यावर त्यांची अंत्यविधी केलेल्या ठिकाणी त्यांचे स्मारक देखील तयार करण्यात आले आहे. २०१९ साली पोलंडचे राजदूतसुद्धा येथे येऊन आठवणींना उजाळा दिला होता. आता सध्या युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी कोल्हापूरच्या एका युवकाने थेट पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रे यांच्याशी पत्रव्यवहार करत आणि ऋणानुबंधांची आठवण करून देत विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे कोल्हापूर आणि पोलंडचे संबंध:
1942 च्या दुसऱ्या महायुद्धात जेव्हा हिटलरने पोलंडवासीयांचा अमानुष नरसंहार सुरु केला तेव्हा त्यांच्यावर आपला देश सोडायची वेळ आली होती. यावेळी जगातील अनेक देशांनी निर्वासित पोलंडवासीयांसाठी आश्रयाचे दरवाजे बंद केले. यावेळी हजारो पोलंडवासियांनी देश सोडून जिथे मिळेल तिथे आश्रय घेतला. यावेळी भारतातील दोन संस्थानांनी पोलंडवासियांना आपल्या पदरात घेतले होते आणि ती म्हणजे कोल्हापूर संस्थान आणि जामनगर संस्थान. पोलंडच्या 5 हजार नागरिकांना कोल्हापूरकरांनी म्हणजेच त्याकाळचा करवीर संस्थांनी आश्रय दिला. 1943 ते 1948 दरम्यान कोल्हापूरच्या वळीवडे म्हणजे आताच्या गांधी नगर या ठिकाणी शहाजी महाराज यांनी पोलंडच्या नागरिकांसाठी वसाहत उभी केली होती. या वसाहतीत पोलंडवासियांना एकदम सुसज्ज सोयी सुविधा, बाजारपेठा देखील पुरवण्यात आल्या होत्या. जगभरात युद्ध शिगेला पोहचले असताना या छावणीत पोलंडचे नागरिक अत्यंत गुण्यागोविंदाने राहात होते. कित्येकांचे बालपण इथे गेले. विशेष म्हणजे आजही त्यांची तिसरी पिढी कोल्हापुरात कार्यरत आहे. २०१९ मध्ये देखील याच आठवणींना उजाळा देत संभाजीराजे छत्रपती यांनी पोलंडला कोल्हापूर भेटीचे निमंत्रण दिले होते. यावेळी पोलंडचे भारतातील राजदूत अॅडम बुरक्वोस्की आणि त्यांची टीम कोल्हापुरात आली होती.
शिवसेना प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही केले ट्विट:
युक्रेनमधील विद्यार्थ्यांना पोलंडच्या सीमेवर अडवले जात असल्याची माहिती मिळताच शिवसेना प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पोलंडच्या राजदूतांना ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने यात लक्ष घालावे असे त्या म्हणाल्या होत्या. मात्र, या ट्विटला पोलंडच्या राजदूतांनी प्रत्युत्तर देत पोलंड सरकारने कोणालाही अडवले नसल्याचे स्पष्ट केले आहे.