कोल्हापूर - शहरात गवळी गल्ली, बुधवार पेठ, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, बागल चौक, उत्तरेश्वर रंकाळा वेश, दुधाळी या ठिकाणी पारंपरिक दुग्ध व्यावसायिक आहेत. सर्वांच्या मिळून साधारण पाच ते सात हजार म्हशी आहेत. म्हशींना रोज पाणवठ्यावर नेत स्वच्छ ठेवणे आवश्यक असते. यापूर्वी नदीत तलावात म्हशींना सोडून दिले की काम होत असे. आता प्रदूषणामुळे त्यावर निर्बंध आणले गेले आहेत. नदीत तलावात म्हशी सोडल्यावर कारवाई सुरू झाली आहे .त्यामुळे एवढ्या म्हशी रोज धुवायच्या कोठे हा प्रश्न गंभीर ठरला आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी यांनी मंगळवार पेठ बेलबाग महालक्ष्मी नगर परिसरातील म्हैस पालन करण्यासाठी भविष्यातील कारवाई ओळखून "कॅटल सर्विस सेंटर दूध कट्टा व पार्लर" उभे केले आहे.
कान हलवत, अंग झटकत ही म्हैस अंगावर पडणाऱ्या पाण्याच्या धारेचा आनंद घेत आहेत. म्हशीचा मालक हातातल्या पोच्याने म्हशीचे अंग घासून स्वच्छ करत आहे. म्हशीचा काळारंगही किती ताजातवाना असतो हे म्हशीच्या त्या ओल्या अंगाकडे पहिल्या नंतर लगेच जाणवत आहे. म्हशींचे असे लाड सध्या कोल्हापुरात सुरू आहेत. दूध कट्ट्यावरचे धारोष्ण दूध आणि अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या कोल्हापुरातल्या म्हशींसाठी अशी मोफत सुविधा मंगळवार पेठेतील बागेत सुरू झाली आहे. पंचगंगा नदी, रंकाळा, कोटितीर्थ, कळंबा तलाव म्हशी धुतल्या तर तो पर्यावरणाची हानी केल्याचा गुन्हा आहे. त्यावर उपाय म्हणून बेलबागेत चक्क म्हशीसाठी शॉवर बाथ, ब्युटी पार्लर सुरू करण्यात आले आहे. कोल्हापुरातील गाई-म्हशी नदी तलावातील पाण्यात धुवू नयेत, ही यामागची भावना आहे. कोल्हापूर महापालिका व डीपीडीसीच्या माध्यमातून हा शॉवर बाथ उभा राहिला आहे.
म्हशींना पाणवठयावर सोडण्यास निर्बंध आल्यामुळे त्यांनी उदघाटन वगैरे न करता हे बाथ सेंटर सुरू केले आहे. त्याला कॅटल सर्व्हिस सेंटर व पार्लर असे नाव दिले आहे. जवळच्या गंजीवाले खणीतले पाणी पंपाने उपसून या ठिकाणी आणले आहे .तेथे एका वेळी पाच सहा म्हशी उभ्या करता येतात. येथे म्हशींना भरपूर पाणी पिता येते. आणि मोटर सुरू केली की पाण्याची धार त्यांच्या अंगावर पडू लागते. फक्त म्हशींसाठी हा शॉवर होता पण म्हशी धुताना शॉवरखाली गवळीही भिजू लागल्याने त्याची रचना थोडी बदलली गेली आहे. आज या भागातील जवळजवळ 190 म्हशींनी या शॉवर बाथचा मनसोक्त अनुभव घेतला. याबाबत मुळे पाणी वाया जात नाही, ते जवळच्या बागेत वळवले गेले आहे. शेण साठवले गेले आहे. त्याचा खत म्हणून वापर केला जात आहे. म्हशीच्या अंगावरील केस काढल्यानंतर ते याच ठिकाणी साठवण्याची सोय करण्यात आली आहे. या म्हशींच्या शॉवर बाथ मुळे गवळी व्यवसायिकांची फार मोठी सोय झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणवठयाच्या ठिकाणी म्हशी सोडणे हे निदान या परिसरातल्या 196 म्हशीसाठी तर कायमचे बंद झाले आहे.
अन्य भागात ही अशी सोय आवश्यक -
ठिकाणी गाई-म्हशी सोडल्याने पाण्याचे प्रदूषण होते हे खरे आहे. मग कोल्हापुरातल्या म्हैस पालन करणाऱ्यानी म्हशी कोठे धुवायच्या यासाठी ही सोय करण्यात आली आहे. पारंपारिक म्हैस पालनाचा व्यवसाय यामुळे जपला जाईल आणि पाण्याचे प्रदूषण ही थांबेल. शहराच्या इतर भागातील अशी सोय करता येईल. आमच्या मंगळवार पेठपुरता तरी मी हा प्रश्न सोडवला आहे .