औरंगाबाद - शहरातील मनपा झोन क्रमांक तीन अंतर्गत येणाऱ्या 13 वॉर्डांमध्ये मागील काही दिवसांपासून कचरा संकलन नसल्यामुळे सर्व वॉर्डातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या अनेक वार्डातील नागरिकांनी संबंधित नगरसेवकांना जाब विचारल्यामुळे नगरसेवकांनी झोन अधिकारी यांची भेट घेत, लवकरात लवकर कचरा संकलन करण्यात यावे अन्यथा कचरा रस्त्यावर फेकू, अशी भूमिका घेतली. त्यावर कचरा संकलन होईल व संबंधित कंपनीला दंड ठोठावण्यात येणार असल्याचे आश्वासन वार्ड अधिकारी सी.एम अभंग यांनी दिले.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशा परिस्थितीत साथीचे रोग पसरण्याची भीती आहे. त्यातच शहरातील झोन क्रमांक तीनमधील 13 वॉर्ड यात रशिदपुरा, एस टी कॉलनी, शहाबाजार, नेहरूनगर, किराडपुरा, रहेमानिया कॉलनी शरिफ कॉलनी रोशन गेट कैसर कॉलनी, संजयनगर, बारी कॉलनी, इंदिरा नगर, अल्तमश कॉलनी आदी वार्डाचा समावेश आहे.
मागील चार दिवसांपासून या भागांमध्ये कचरा संकलन करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांनी नगरसेवकांना धारेवर धरले, त्यानंतर नगरसेवकांनी सेंट्रल नाका येथील कार्यालयात जाऊन अधिकारी सी.एम. अभंग यांची भेट घेतली व समस्या सोडवण्याची मागणी केली. वार्ड अधिकारी अभंग यांनी माहिती घेऊन रेड्डी कंपनीला पंचवीस हजारांचा दंड ठोठावत समस्या सोडवण्याचे आश्वासन नगरसेवकांना दिले. यावेळी नासिर सिद्दिकी, शेख अहमद अजीम खान, रफिक खान उर्फ रफिक चिता आदींची उपस्थिती होती.