औरंगाबाद - राज्य सरकारने आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. मात्र ही मदत म्हणजे शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसल्यासारखी आहे, अशी टीका शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केली. शेतकऱ्यांनी 50 हजार रुपये हेक्टरी मदत मागितली असताना दहा हजार रुपये मदत जाहीर करणे ही शेतकऱ्यांची थट्टा नाही का? असा प्रश्न देखील जयाजी सूर्यवंशी यांनी राज्य सरकारला विचारलाय.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली. जिरायत आणि बागायत शेतीसाठी हेक्टरी दहा हजाराची तर फळबागेसाठी 25 हजारांची मदत जाहीर केली. मदत देत असताना दोन हेक्टरची मर्यादा देण्यात आली आहे. मात्र जाहीर केलेली मदत म्हणजे वेळकाढूपणा असल्याचा आरोप शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केला.
हेक्टरी 50 हजारांची मदत मागितली असताना दहा हजारांची मदत सरकारने जाहीर केली. हेक्टरी 25 हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्यांना आलेला आहे. खर्च कसा काढायचा? बँकेचे हप्ते कसे भरायचे या विवंचनेत असताना सरकार काहीतरी भरीव मदत करेल अशी अपेक्षा होती. मात्र राज्य सरकारने जाहीर केलेली मदत खूप तोडकी आहे. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्या सारखे आहे. कोरोनाच्या काळामध्ये फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात सरकार भरीव मदत करेल, अशी अपेक्षा असताना, सरकारने अपेक्षाभंग केला आहे. शेतकरी, विरोधी पक्ष, राजकीय पक्ष हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी करत होते. मात्र राज्य सरकारने तसे न करता फक्त वेळकाढूपणा केल्याचा आरोप शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केला आहे.