जळगाव - पुरेशा प्रमाणात गोदाम नसल्याने सीसीआयने ( कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदी तीन आठवड्यांपासून थांबविली आहे. दुसरीकडे व्यापारी शेतकऱ्यांना कमी भाव देत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
सीसीआय स्थानिक पातळीवर जिनिंग कारखानदारांशी करार करून त्यांच्याकडून भाडेतत्त्वावर जिनिंग करवून घेत असते. जिल्ह्यातील ५ ते ६ तालुक्यात सीसीआयने कापूस खरेदी केली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सीसीआयची कापूस खरेदी बंद आहे.
जानेवारीपासून गुणवत्तेच्या निकषात सीसीआयने कापसाचे दर ५,५५० वरून ५,४५० प्रति क्विंटल केले आहेत. मात्र मार्च महिन्यात संपूर्णपणे खरेदी बंद करण्यात आली आहे. दरम्यान सीसीआयने कापूस खरेदी करावी, अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.
हेही वाचा-'COVID 19'चा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम नाही - अनुराग ठाकूर
सीसीआय बाजारपेठेचा आधार-
सीसीआयची कापूस खरेदी केंद्र हा शेतकऱ्यांचा एकमात्र आधार आहे. खासगी बाजारात ४,७०० ते ४,८०० रुपये प्रति क्विंटल कापूस खरेदी होत आहे. सीसीआयच्या केंद्रावर मात्र शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीच्या कापसासाठी तब्बल ५४५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी मोठा आधार असल्याने सीसीआयच्या खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. यंदा विदर्भात प्रमाणावर कापूस खरेदी करणाऱ्या सीसीआयला कापूस गाठी साठवणूक करण्यासाठी पुरेसे गोदामे उपलब्ध नाहीत. शिवाय भाव कमी झाल्याने पडून असलेली सरकीची वेळेत विक्री करण्याचेदेखील मोठे आव्हान आहे.
हेही वाचा-कोरोनाचे सावट : शेअर बाजारात चढ-उतार सुरू
गुणवत्तेची अडचण-
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात कापसाची गुणवत्ता खराब झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या तुलनेत खान्देशातील कापसाची गुणवत्ता खराब आहे. कवडी आणि रेड डॅमेज कापसाचा थेट गुणवत्तेवर परिणाम होतो.
सीसीआयचे प्रत्येक महिन्याचे गुणवत्तेचे आणि खरेदीचे निकष वेगळे आहेत. त्यात नुकसान होण्याची भीती असल्याने जिनिंग कारखानदार सीसीआयसोबत करार करण्यास धजावत नसल्याची स्थिती आहे. मार्च महिन्यात येणाऱ्या कापसाची गुणवत्ता लक्षात घेऊन सीसीआयने तोडगा काढल्यास खान्देशात सीसीआयची खरेदी सुरू होवू शकते. दरम्यान, सीसीआयची एजंट म्हणून काम करणाऱ्या राज्य कापूस पणन महासंघाकडून मात्र कापूस खरेदी सुरू आहे.
हेही वाचा-घरी बसून काम करा; नॅशनल स्टॉक एक्सचेंजची कर्मचाऱ्यांना सूचना
सीसीआयने १ कोटी गाठी खरेदी केली आहे. त्यांच्याकडे जागेचा अभाव आहे. पण लवकरच खरेदी सुरू होणार असल्याचे खान्देश जिनिंगचे प्रदीप जैन यांनी सांगितले. करारामधील अडचणीबाबत बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
जळगावमध्ये केळीबरोबर दर्जेदार कापसाचे चांगले उत्पादन होते. केंद्र सरकारने कापूस खरेदीला मुदतवाढ होवूनही खरेदी बंद आहे. व्यापाऱ्यांकडून कमी भाव दिला जात आहे. प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या घरी कापूस साठा आहे. जर कापूस खरेदीला मुदत वाढ दिली नाही तर शेतकरी अडचणीत येणार आहे, असे शेतकरी किशोर चौधरी यांनी सांगितले.