नांदेड - जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील बळेगाव येथे वीज पडून दोन बैल ठार झाल्याची घटना घडली आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर बैलांवर वीज पडून मृत्यू झाल्यामुळे शेतकऱ्यावर दुहेरी संकट कोसळले आहे. जिल्हयात मंगळवारी झालेल्या पावसाने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. असे असले तरी गेल्या दोन महिन्यांपासून उकाडयाने त्रस्त झालेल्या नांदेडकरांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मान्सून वेळेवर बरसेल, असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वीच व्यक्त केला होता. सोमवारी काही भागात हजेरी लावणारा पाऊस मंगळवारी जिल्ह्याच्या वेगवेगळया भागात वादळवाऱ्यासह बरसला. मुखेड, देगलूर, नरसी, नायगांव नांदेड शहर आणि परिसरात सकाळी काही काळ सूर्यदर्शन घडले. परंतू दुपारनंतर अचानक वातावरणात अचानक बदल झाला. तास-दोन तास जोरदार पाऊस पडला. विजांचा कडकटाड तसेच वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसाने नांदेडकर सुखावले.
दरम्यान, देगलूर तालुक्यातील बळेगाव शिवारातील गंगाधर नागोराव देगावे शेतकऱ्यांच्या गोठयावर वीज पडून झालेल्या दूर्घटनेत दोन बैल मृत्युमुखी पडले.