अहमदनगर - ज्येष्ठांचा अपमान करणारे कारटं लोकसभेत जात कामा नये. राधाकृष्ण विखेंनी मुलाला ज्येष्ठांचा सन्मान करायला शिकवले का हाच प्रश्न आता उपस्थित होतो, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजप उमेदवार सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला. ते अहमदनगर येथे आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
मोदींचे वटारलेले डोळे पाहून मुख्यमंत्री आणि सुजय दोघेही घाबरले असतील. सुजयला रात्री झोप आली नसेल, असे आव्हाड म्हणाले. राधाकृष्ण विखेंच्या संस्कारावच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुजय हे ज्येष्ठांचा अपमान करणारे कार्टे आहे. असले कार्टे लोकसभेत जाता कामा नये असे आव्हाड म्हणाले. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दुसऱ्या बाजूल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भाजपवर निशाणा साधला. अहमदनगर जिल्ह्यातील साखळाई पाणी योजना कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. पण, भाजप सरकार ती पूर्ण करू शकले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार येताच आम्ही ही योजना पूर्ण करु, असे आश्वासन पाटील यांनी दिले. या सभेला आमदार अरुण जगताप, राहुल जगताप, घनश्याम शेलार, शारदा लगड, राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.