वर्धा- नवीन निर्देशानुसार जुलै महिन्यात कलम 144 लागू करत रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशात नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासह नियमावली देण्यात आली आहे. जिल्ह्यातील दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील. तर रात्रीला नाईट कर्फ्यू लागू राहणार आहे. या कर्फ्यू काळात अत्यावश्यक सेवा वगळता संचार करण्यास काही बंधने असणार आहेत.
जिल्ह्यात काही बाबी वगळता सर्वच व्यवहार पुन्हा पूर्ववत सुरू झाले आहेत. मात्र काही बाबींवर अजूनही निर्बंध आहेत. सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण व कोचिंग संस्था पूर्णता बंद राहतील. परंतु, ऑनलाईन दुरस्थ पद्धतीने अभ्यासक्रम सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
पूर्वीच्या नियमानुसारच सर्व सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जलतरण तलाव , मनोरंजन पार्क, थिएटर, बार, सभागृह आणि असेंब्ली हॉल इत्यादी ठिकाणे हे मार्च महिन्यापासून बंद असून ते कायम राहणार आहे. सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिककार्य, मेळावे घेण्यास बंदी असणार आहे. शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, यामधील डायनिंग सुविधा बंद राहील. तंबाखू, पान, चहाची टपरी पुढील आदेशापर्यंत बंद राहील. सर्व धार्मिक स्थळे, पूजेची ठिकाणे भाविकांसाठी बंद ठेवण्यात येतील.
या बाबींव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने, व्यवसाय उद्योग सुरू राहतील. मात्र कोरोनासाठी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. दुकानदारांनी नियमाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी विवेक भीमानवार यानी सांगितले आहे.
लोकांना येण्या जाण्यास परवानगी घेणे बंधनकारक
यात सुरवातीपासून वर्धा जिल्ह्यात ये-जा करण्यास सीमाबंदीचे कटेकोरपणे पालन केले जात आहे. यात पुढेही या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. जिल्हा सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्ह्याच्या सिमेत ये-जा करताना परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.