देहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. रावत यांच्या कार्यशैलीबद्दल अनेक मंत्र्यांनी व आमदारांनी आक्षेप व्यक्त केला होता. त्यानंतर सोमवारी त्यांना पक्षातील वरिष्ठांनी दिल्लीला बोलावले होते. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आले होते.
पक्षाचे मानले आभार..
त्रिवेंद्रसिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर आपल्या पक्षाचे आभार मानले आहेत. मी एका सामान्य कुटुंबातून आलो आहे. पक्षाने आपल्याला चार वर्षे राज्याची सेवा करण्याची संधी देऊन आपला सन्मान केला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
गेल्या चार वर्षांमध्ये आम्ही महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी विविध प्रकारची कामे केली. महिलांसाठी वडिलोपार्जित संपत्तीमध्ये समान वाटा, आणि मुख्यमंत्री घस्यारी कल्याणकारी योजना या आमच्या काही विशेष योजना ठरल्या. आता पक्षाने संयुक्तपणे याबाबत निर्णय घेतला आहे, की मी माझे पद, माझी जबाबदारी दुसऱ्या कोणालातरी सोपवावी. पक्ष ज्या कोणाकडे ही जबाबदारी सोपवेल, त्याला माझ्या शुभेच्छा असतील असेही ते म्हणाले.
दरम्यान, राजीनामा देण्यास पक्षाने का सांगितले याबाबत विचारणा केली असता त्यांनी याबाबत तुम्ही दिल्लीलाच जाऊन प्रश्न विचारा असे उत्तर दिले.
हेही वाचा : कोलकाता इमारत आग : मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचण्या सुरू