नवी दिल्ली - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी त्रिपुरा हिंसाचारावरून (Tripura violence) भाजपा सरकारवर टीका केली. त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. भाजपाच्या अपयशामुळे दंगलखोरांनी मशिदींवर हल्ले केले. त्रिपुरा सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरामध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. उत्तर त्रिपुरा जिल्ह्यात दोन ते तीन हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यामध्ये मोर्चेकऱ्यांनी मशिदीचं नुकसान केलं होतं.
कासगंज प्रकरणावर भाष्य करताना ओवैसी यांनी अल्ताफच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप केला. अल्ताफचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला आणि पोलिसांनी सांगितले की अल्ताफने शौचालयातील पाण्याच्या टाकीच्या पाईपचा वापर करून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांना निलंबित न करता अटक करण्यात यावी, अशी मागणी ओवैसी यांनी केली.
त्रिपुरातील हिंसाचाराला बांगलादेशाचे कनेक्शन -
त्रिपुरामध्ये होत असलेल्या हिंसाचाराचे मुळ हे बांगलादेशामध्ये आहे. बांगलादेशात नवरात्रौत्सवादरम्यान दुर्गा पूजेचे काही मंडप उद्धवस्त करण्यात आले होते. बांगलादेशात झालेल्या हिंसाचारात सात जणांचा मृत्यू झाला होता. मंदिरांमध्ये नासधूस करण्यात आली होती. हिंदू अल्पसंख्याक असलेल्या बांगलादेशात शेकडो घर आणि मालमत्तांचं नुकसान करण्यात आलं होतं. त्याच रागातून त्रिपुरामध्ये आयोजित केलेल्या मोर्चामध्ये मशिदीचं नुकसान करण्यात आले. मुस्लिमांच्या संपत्तीचं नुकसान करण्यात आलं. या पार्श्वभूमीर तणावग्रस्त भागांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि पोलीस आमनेसामने आले आहेत.
त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्रात -
त्रिपुरात घडलेल्या अत्याचाराच्या प्रकारानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी राज्यातील विविध भागांत निषेध मोर्चे काढण्यात आले. मात्र, या मोर्चाला गालबोट लागलं. बंदला हिंसक वळण लागलं आणि जमावाकडून दुकानांवर दगडफेक झाली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे.