देवघर (झारखंड) - त्रिकुट रोपवेमध्ये ( Trikut Ropeway ) काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रोपवे हे हवेतच अडकले ( Deoghar Jharkhand Ropeway Accident ) आहे. मागील 20 तासांपासून देवघर त्रिकुट रोपवे मध्ये 48 पर्यटक अडकले होते. त्यातील 19 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात हवाई दलाच्या जवानांना यश आले आहे. देवघर त्रिकुट परिसरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी हवाई जलाच्या जवानांकडून बचाव हे युद्धपातळीवर सुरू ( rescue work continue in deoghar ) आहे. या दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर काहीना ड्रोनच्या मदतीने नागरिकांना अन्न आणि पाणी पुरवठा केला जात आहे.
2500 फुटांपेक्षा जास्त उंचीमुळे बचाव कार्यात अडचणी - त्रिकुट पर्वताच्या रोपवेमध्ये अडकलेल्या पर्यटकांना खाली काढण्यासाठी ट्रॉलीजवळ पोहोचल्यानंतर हवाई दलाचे हेलिकॉप्टर परतले होते. याचे कारण हवेत लटकलेल्या 12 ट्रॉलींमधून लोकांना बाहेर काढण्याचा कोणताही मार्ग नव्हता. यासोबतच ट्रॉलीच्या अगदी जवळ मोठे खडक आहेत. त्यामुळे हेलिकॉप्टरलाही त्यांच्याशी टक्कर होण्याचा धोका होता. 2500 फुटांपेक्षा जास्त उंचीमुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. घटनास्थळी एनडीआरएफच्या टीमसह लष्कराचे जवान आणि स्थानिक पोलीस दल उपस्थित आहे.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी व्यक्त केला शोक - देवघर जिल्ह्यातील त्रिकूट डोंगरावरील रोपवेची वायर तुटल्याने झालेल्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेनंतर मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि बचाव पथकाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये तज्ज्ञांचीही मदत घेतली जात आहे. या अपघातावर सरकारचे बारीक लक्ष आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी सरकारकडून सातत्याने सूचना दिल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले आहे.
![Deoghar Trikut Ropeway Accident :](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14986675_heli11.jpg)
दोषींवर कारवाई केली जाईल - आपत्ती व्यवस्थापन मंत्री बन्ना गुप्ता यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. सर्व पर्यटकांची सुटका करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लवकरच सर्वांना सुखरूप खाली आणले जाईल. त्याचबरोबर या अपघाताची चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीवर चौकशीनंतर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.