नवी दिल्ली - दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसच्या महागाईविरोधातील हल्लाबोल रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. (Congress party Halla Bol rally) ते म्हणाले की यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीने चौकशी केली आहे. त्यांनी माझी 55 तास चौकशी केली, पण 5 वर्षे 55 तास चौकशी केली तरी मी घाबरणार नाही. असा घणाघात त्यांनी केला आहे.
भारताला कमकुवत केले - रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर महागाईविरोधात काँग्रेसची हल्लाबोल रॅली काढण्यात आली. या रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित केले. (Rahul Gandhi strongly criticized the Modi government) पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर निशाणा साधत पंतप्रधान द्वेष पसरवून भारताला कमकुवत करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मीडियाने देशातील जनतेला घाबरवले - आरएसएस-भाजप देशात फूट पाडून राज्य करत आहेत. गेल्या 8 वर्षांत कुणालाही फायदा झाला नाही. मीडियाने देशातील जनतेला घाबरवले. देशातील दोन उद्योगपतींनी द्वेष आणि भीतीचा फायदा घेतला. "तेल, विमानतळ, मोबाईल हे संपूर्ण क्षेत्र या दोन उद्योगपतींना दिले जात आहे. विमानतळ असो की सेल फोन असो की तेल याचा फायदा या दोन उद्योगपतींना होत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.