चैन्नई - दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आपल्या स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा 31 डिसेंबरला करणार आहेत. येत्या नवीन वर्षात राजकीय कारकिर्दीची दमदार नवी सुरुवात ते करणार आहेत. त्यांच्याकडे तामिळनाडूतील सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यादरम्यान विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे राज्यात सध्या राजकीय वारे जोरात वाहत आहेत. रजनीकांत यांनीही सोमवारी आपल्या रजनी मक्कल मंडरम या संघटनेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर आज दुपारी रजनीकांत यांनी आपल्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाची घोषणा केली.
गेली दोन वर्षे रजनीकांत राजकारणात सक्रिय आहेत. परंतु, अधिकृतपणे त्यांनी अद्याप राजकारणात प्रवेश केलेला नाही. यापूर्वी अभिनेते आणि राजकीय नेते कमल हासन (मक्कल निधी माईम पक्षाचे अध्यक्ष) आणि रजनीकांत यांनी तमिळनाडूच्या कल्याणासाठी एकत्र येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
रजनीकांत यांनी डिसेंबर 2017 मध्ये तामिळनाडूत राजकीय पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली होती. विधानसभेच्या 234 जागा लढणार असल्याचेही ते म्हणाले होते. मात्र, लोकसभा नि़वडणुकांमध्ये रजनीकांत यांनी सहभाग घेतला नव्हता. तर सद्य परिस्थीती पाहता, तामिळनाडूमध्ये सध्या सत्ताधारी अण्णा द्रमुक भाजपाच्या मदतीने राज्यातील आपली सत्ता कायम राखण्यास प्रयत्नशील आहे. तर विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकनेही सत्तेत येण्यासाठी करण्यासाठी कंबर कसली आहे.