नवी दिल्ली : आजपासून देशात 5जी मोबाईल (5G Service in India) सेवा सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता 5जी सेवेचं उद्घाटन होईल. पहिल्या टप्प्यामध्ये भारतातील एकूण 13 शहरांमध्ये ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर हळूहळू संपूर्ण देशात 5G सेवा सुरु केली जाईल.
आजपासून देशात 5G इंटरनेट सेवा (5G Internet Service) सुरु होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात (India Mobile Congress - IMC 2022)5जी इंटरनेट सेवा लाँच करण्यात येणार आहे. यामुळे आता भारतातही इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि वोडाफोन आयडिया (Vodafone-idea) या कंपन्या स्पर्धेत आहेत. सध्या बाजारात अनेक 5G मोबाईल उपलब्ध आहेत. तर काही कंपन्या सर्वात स्वस्त 5G मोबाईल देत आहेत. रिलायन्स जियो कंपनीने नुकताच जिओ 5G फोन (Jio 5G Phone) लाँच केला आहे.
5G इंटरनेट सेवा म्हणजे काय? - 5G इंटरनेट सेवा म्हणजे Fifth Generation अर्थात पाचवी पिढी असा आहे. ही सेल्युलर मोबाईल कम्युनिकेशनची पाचवी पिढी म्हणून ओळखली जाते. 5G नेटवर्क 2G, 3G, 4G नेटवर्कपेक्षा अधिक वेगवान असेल. 5G नेटवर्क 4G पेक्षा कमीतकमी 10 पटीने वेगानं इंटरनेट स्पीड देईल.