राउरकेला (ओडिशा) : आज एका बटणाच्या क्लिकवर जगभरात कोणालाही पैसे पाठवले जाऊ शकतात. मात्र ओडिशामध्ये अवघ्या 100 किलोमीटर दूर राहणाऱ्या बहिणीला भावाने पाठवलेली मनीऑर्डर तब्बत चार वर्षानंतर मिळाली! 26 नोव्हेंबर रोजी सुमित्रा बिस्वाल यांना 500 रुपयांची मनीऑर्डर मिळाली. ही मनीऑर्डर त्यांच्या भावाने त्यांना 'सावित्री व्रत' निमित्त 2018 मध्येच पाठवली होती. (money order took 4 years to reach 100 km). (Money Order Took 4 Years).
पोस्ट ऑफिसच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह : राउरकेला येथील सेक्टर 8 मध्ये राहणारे प्रमोद प्रधान यांनी आपल्या बहिणीसाठी सेक्टर 19 येथील पोस्ट ऑफिसमधून पैसे पाठवले होते. चार वर्षांपूर्वी पाठवलेले पैसे आपल्या बहिणीला मिळाले असावेत, असा त्यांचा समज होता. कालांतराने दोघेही ही गोष्ट विसरले. मनीऑर्डर चार वर्षांनंतर सुमित्राकडे पोहोचली तेव्हा ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. या नंतर काही वेळातच ही घटना शहरात चर्चेचा विषय ठरली. डिजिटायझेशनच्या जमान्यात या घटनेने पोस्ट ऑफिसच्या कार्यप्रणालीचे सत्य उघड झाले आहे.
प्रकरणाची चौकशी सुरू : राउरकेला पोस्टल एसपी सर्वेश्वर चौधरी, ईटीव्ही भारतने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तपासानंतरच पोस्ट ऑफिसची चूक लक्षात येईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, प्रमोद प्रधान आणि त्यांचे वकील जहांनंदा साहू यांनी देखील टपाल खात्याच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.