नवी दिल्ली - बिहारच्या 243 मतदारसंघाच्या झालेल्या या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले आहे. एनडीएमधून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढलेल्या लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी एका जागेवर विजय मिळवला आहे. बिहार निकालानंतर त्यांनी आज आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. भाजपाला विजय मिळवून देण्यासाठी आणि जनता दल (यू) ला नुकसान देण्यासाठी आम्ही निवडणूक लढवली. 2025 हेच आमचे लक्ष्य आहे, असे चिराग पासवान यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
मुख्यमंत्री कोण होणार, हे आता भाजप जदयूने ठरवावे. नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले तर त्यांचे अभिनंदन करणार, राजकीय मतभेद रहातील. पण वैयक्तिक वाद नाही. मतमोजणीत घोटोळा झाल्याचा आरोपी विरोधी पक्ष करत आहेत. मात्र, जर निकाल त्यांच्या बाजूने लागला असता तर मतमोजणीत घोटाळा झाला, असे ते म्हणाले नसते, असेही चिराग पासवान म्हणाले.
विरोधकही अभिनंदनास पात्र -
नितीश कुमार यांना कोणत्याही स्थितीत समर्थन नाही. तसेच तेजस्वी यादव यांच्याबरोबरही जाणार नाही. बिहारमध्ये एनडीएने यश मिळवलं. त्यास पंतप्रधान खऱ्या अर्थाने अभिनंदनास पात्र, आहेत. मुख्यमंत्र्याविरोधात वातावरण होते. विरोधकांनी जोरदार टक्कर दिली. त्यासाठी विरोधकांचेही अभिनंदन केले पाहिजे. ही निवडणूक एकतर्फी नव्हती, असेही पासवान म्हणाले.
2025 हेच आमचे लक्ष्य -
पाच वर्ष संघर्ष करत राहणार. पक्षाच्या राज्यात कक्षा वाढल्या असून पार्टी पूर्ण राज्यात पोहचली आहे. यापूर्वी ती काही मतदारांपुरती मर्यादित होती. आता 2025 हेच आमचे लक्ष्य आहे. तसेच केंद्रात आम्ही मोदींचे समर्थन करत आलो आहोत. तसेच येथून पुढेही करत राहणार. राज्यात भाजपा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. तसेच सत्तेत राहणे आमचे लक्ष्य असते, तर आम्ही एनडीएमधून बाहेर पडलो नसतो. संघर्षाचा रस्ता आम्ही निवडला आहे, असे चिराग पासवान म्हणाले.
जनता दल (यु) चे नुकसान करण्यासाठी निवडणूक लढलो -
लोजपामुळे जनता दल (यु) ला मोठा धक्का बसला. त्यांना नुकसान झालं भाजपाला फायदा होण्यासाठीच वेगळे लढलो. आमच्यामुळे भाजपाला फायदा मिळाला. जे लक्ष्य होतं ते पूर्ण केलं. नितीश कुमार यांच्याकडे विकासाची दृष्टी नाही. त्यांना नुकसान कसे होईल, हेच मी पाहिले. तसेच यापुढे कोणाबरोबर आघाडी करणार नाही. तेजस्वींबरोबर जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - चिराग पासवान यांचा नितीश यांना हिसका! जाणून घ्या एलजेपीमुळे किती जागांवर झाला पराभव