कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा प्रभाव वाढत चालला आहे. लोकसभेच्या १८ जागांवर भाजपने बाजी मारली आहे. त्यामुळे आता तरी तृणमूलने आत्मपरिक्षण करावे, असे मत एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आज व्यक्त केले. ते बंगालमध्ये आपल्या दौऱ्याच्या वेळी बोलत होते.
भाजपची बी-टीम असल्याचे आरोप फेटाळले..
ओवैसींनी आज पश्चिम बंगालमध्ये जात तेथील मुस्लीम नेते अब्बासुद्दीन सिद्दीकी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी एमआयएम ही भाजपची बी-टीम असल्याचा तृणमूलचा आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले की आम्ही इथे भाजप विरोधी मतं खाण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी निवडणूक लढवणार आहोत.
स्वबळावर लढण्याबाबत निर्णय नाही..
बिहारमध्ये चांगले यश मिळवल्यानंतर आता ओवैसींनी पश्चिम बंगालकडे आपला मोर्चा वळवला आहे. मात्र, याठिकाणी एमआयएम स्वबळावर लढणार आहे, की कोणासोबत युती करणार आहे याबाबतचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे ओवैसींनी सांगितले.
बंगालमधील निवडणुकीमध्ये आपण समाजातील दुर्बल घटकांचा विकास आणि त्यांचे राजकीय सशक्तीकरण या मुद्द्यांवर लक्ष देणार असल्याचे ओवैसींनी सांगितले. या प्रचारासाठी आपल्या पक्षाचे हे दोन मुख्य मुद्दे असणार आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.
एमआयएम पक्षाचा विस्तार..
नुकतेच एमआयएम पक्षाने बिहार विधानसभा निवडणूक लढली. यात पक्षाचे चांगले यशही मिळाले. गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असल्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केले आहे. यासोबतच आता बंगाल विधानासभा निवडणुकीची तयारी ओवैसी यांनी सुरू केली आहे.
हेही वाचा : कोरोना लसीबाबत प्रश्न उपस्थित करणे दुःखद - गिरिराज सिंह