लखनौ - समाजवादी पक्षाने पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात उतरवलेला आपला उमेदवार बदलला आहे. वाराणसीत त्यांनी सीमा सुरक्षा बलाचे बडतर्फ जवान तेज बहादुर यादव यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी त्यांनी येथून शालिनी यादव यांना उमेदवारी दिली होती. तेज बहादुर यादव यांनी बीएसफ कॅम्पमधील निकृष्ठ दर्जाचे जेवणावर प्रश्न चिन्ह उचलल्यानंतर त्यांना बडतर्फ करण्यात आले होते.
लोकसभा निडणुकीच्या शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यात वाराणसी येथे मतदान होणार आहे. येथून पंतप्रधान मोदी उभे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी येथे मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. त्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी येथून निवडणूक लढणार, असे म्हटले जात होते. तर, समाजवादी पक्षाने काँग्रेसचे माजी खासदार आणि राज्यसभेचे माजी उपसभापती श्यामलाल यादव यांची मुलगी शालिनी यांना उमेदवारी दिली होती. त्याजागी आता समाजवादी पक्षाने बदल केला आहे. या बदलानंतर काय परिणाम होतो ते पाहण्यासारखे झाले आहे.
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. येथून पंतप्रधान मोदीसारखेच माजी पंतप्रधान चंद्रशेखर, काँग्रेस नेते कमलापती त्रिपाठी आणि दिवंगत पंतप्रधान लालबादुर शास्त्री यांचे पुत्र अनिल शास्त्री यांनीही निवडणूक लढवली आहे. २००९च्या निवडणुकांमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनीही निवडणूक जिंकली होती.
मागच्या लोकसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांनी मोदींविरोधात निवडणूक लढवली होती. त्यामध्ये २ लाख मत घेऊन ते दुसऱ्या स्थानावर होते. मात्र, २००९च्या आकड्यांवर नजर टाकली तर, एसपी आणि बसप यांना एकूण मुरली मनोहर जोशी यांच्यापेक्षा जास्त मतदान मिळाले होते. मात्र, दोघांनी वेगवेगळी निवडणूक लढवल्यामुळे मुरली मनोहर जोशी निवडून आले होते. यावेळी मात्र हे दोन्ही पक्ष एकत्र असल्यामुळे मोदींसमोर आव्हान उभे राहू शकते.