पणजी - जगातील अत्याधुनिक रेल्वे बनवण्यासाठी 2030 पर्यंत रेल्वेत 50 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. यासाठी एवढी गुंतवणूक एकट्या सरकारला शक्य नाही. सरकारी परवानगीने एखादा उद्योजक खासगी रेल्वे रूळ टाकू शकतो. परंतु, कोणत्याही परिस्थितीत रेल्वेचे खाजगीकरण होणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी शनिवारी दिली. उत्तर गोव्यातील साखळी येथे भाजपतर्फे राज्यस्तरीय सदस्यता मोहीम शुभारंभासाठी ते आले असता बोलत होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा साखळी हा मतदारसंघ आहे. त्यामुळे साखळी येथील रवींद्र भवनमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री सावंत, प्रदेश भाजपाध्यक्ष विनय तेंडुलकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर आणि उत्तर गोवा सरचिटणीस सदानंद तानावडे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत गोयल यांच्या हस्ते राज्यस्तरीय सदस्यता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
रेल्वेमंत्री पीयुष गोयल म्हणाले की, यावर्षी केंद्र सरकारचे रेल्वेतील गुंतवणुकीचे लक्ष्य 1 लाख 60 हजार कोटीचे आहे. मागील 70 वर्षांत रेल्वेमध्ये केवळ 30 टक्के गुंतवणूक करण्यात आली. तर प्रवाशी आणि मालवाहतूक प्रमाण 1500 टक्क्यांनी वाढले. केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत बोलताना गोयल म्हणाले, या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्य समाजाला लाभ देण्याचा प्रयत्न आहे. सरळ जीवन जगण्यासाठीचे हे अंदाजपत्रक आहे. कारण केंद्र सरकारचे 2022-25 पर्यंत पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य आहे.
कोकण रेल्वेचे 100 टक्के विद्युतीकरण
कोकण रेल्वेचे 100 टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 11 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हे काम येत्या दीड वर्षात पूर्ण केले केले जाणार आहे. तसेच गोव्यातील रेल्वे मार्गही पूर्णपणे विद्युतीकरण करण्यात येणार आहे. यासाठी मंजुरी मिळाली असून हे काम पुढील साडेतीन वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. तसेच विस्टाडोमची संख्याही वाढवली जाणार आहे. कोकण रेल्वे मार्ग पूर्णपणे दुपदरी करणे शक्य नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी लूपलाईन टाकण्यात येणार आहे. तसेच गोव्यातील रेल्वेमार्ग दुपदरी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महिला आणि मुलांची सुरक्षितता हाच रेल्वेचा उद्देश असल्याचे गोयल यांनी सांगितले. मागील पाच वर्षांत कोकण रेल्वे आणि गोव्यातील रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांनी 257 मुलांची सुखरुप सुटका केली आहे.