श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधून एका गावाच्या सरपंचाला दहशतवाद्यांशी संबंध असल्यामुळे अटक करण्यात आली होती. हा सरपंच भाजप पक्षाचा असल्याचे म्हटले जात होते. मात्र, त्याला २०१८मध्येच पक्षातून काढून टाकले होते, असे पक्षाचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.
दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात चौकशी करताना एका सरपंचाला राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली होती. याप्रकरणी डीएसपी दविंदर सिंग या पोलीस अधिकाऱ्यालाही अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेला सरपंच हा भाजपचा असल्याची चर्चा समाजमाध्यमांमधून होत होती. त्यावर पक्षाचे प्रवक्ते ठाकूर यांनी वरील खुलासा केला आहे.
भाजपशी कोणाचाही संबंध जोडण्यापूर्वी माध्यमांनी सत्यता पडताळून पहावी. ज्या व्यक्तीला अटक केली त्याला पक्षाने २०१८ मध्येच बडतर्फ केले आहे. भाजपशी संबंधित सर्व व्यक्ती या पारदर्शक आणि स्वच्छ चारित्र्याच्या आहेत. आमचा पक्ष कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना समर्थन देत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : आम आदमी पक्षाच्या आमदाराला कोरोनाची लागण