नवी दिल्ली - आज कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशाचा 74 वा स्वातंत्र्य दिन अतिशय साध्या पद्धतीने पार पडतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 15 ऑगस्ट रोजी सातव्यांदा लाल किल्यावरून देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व प्रथम सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मेरे प्यारे देशवासियो म्हणत मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. स्वातंत्र्य दिनाच्या या भाषणात त्यांनी भविष्यातील संकल्प देशवासीयांपुढे मांडले. यामध्ये त्यांनी आत्मनिर्भर भारत, कोरोना संकट, कृषी क्षेत्र, नॅशनल डिजीटल हेल्थ मिशन आदी विषयांवर भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संबोधनातील मुद्दे :
पुढच्या वर्षी आपण स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात पदार्पण करणार आहोत. त्यासाठी आपल्याला अनेक संकल्प करायचे आहेत. हा काळ त्यासाठीची मोठी संधी आहे. भारताने स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा, जगासाठी प्रेरणादायी ठरला, या लढ्याने अनेकांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली.
भारताने नेहमीच असा विश्वास ठेवला आहे की, संपूर्ण जग एक कुटुंब आहे. आपण आर्थिक वाढीवर आणि विकासावर लक्ष केंद्रित करत असताना मानवताही निभावली आहे. तसेच मला माझ्या सहकाऱ्यांच्या क्षमता, आत्मविश्वास आणि संभाव्यतेबाबत आत्मविश्वास आहे. एकदा आपण काही करण्याचे ठरवले की, तर ते लक्ष्य साध्य होईपर्यंत विश्रांती घेत नाही.
कोरोनाच्या या काळात प्रत्येक नागरिकानं, आत्मनिर्भरभारत घडवण्याचा संकल्प केला आहे. आत्मनिर्भरभारत हा केवळ एक शब्द नाही तर एक मंत्र झाला आहे. जगाच्या कल्याणात भारताचेही योगदान गरजेचे आहे. त्यासाठी आधी आपल्याला आपला देश अधिक सक्षम करावा लागेल. त्यासाठी आपल्याला आत्मनिर्भर व्हावे लागेल. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले, तरी आत्मनिर्भर भारतची वाटचाल आता थांबू शकत नाही. आत्मनिर्भर भारत म्हणजे केवळ आयात कमी करणे नाही तर आपली क्षमता, सर्जनशीलता, कौशल्यही वाढवायची आहेत.
आपल्याला आपल्या कृषी क्षेत्राला अधिक सक्षम, आत्मनिर्भर करण्याची गरज असून त्यादृष्टीने अनेक कामे सुरू आहेत. कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि पायाभूत सुविधांचा विकास करणे गरजेच आहे. त्याचबरोबर ग्रामीण उद्योगांचा विकास करणे ही देखील काळाची गरज आहे.
भारतात निर्माण होणाऱ्या सर्व उत्पादने आणि वस्तूंचे जगभरात नावाजल्या जातील, असे कार्य आपल्याला करायचं आहे. 'लोकल फॉर वोकल' आपल्या आयुष्याचा मंत्र बनायला हवा. आपल्याला मेक इन इंडिया सोबतच मेक फॉर वर्ल्ड या उद्देशानं काम करायचं आहे.आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी संतुलीत विकास गरजेचा आहे.
भारतात परराष्ट्र गुंतवणुकीनं देशातील आत्तापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. भारतात परराष्ट्र गुंतवणुकीत तब्बल 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. आपण देशाचे धोरण, लोकशाही आणि आपल्या अर्थव्यवस्थेच्या पाया मजबूत करण्यावर कार्य केले म्हणून जगाने भारतावर विश्वास दाखवला.
आत्मनिर्भर, आधुनिक, नव्या, समृद्ध भारताच्या निर्माणासाठी देशाच्या शिक्षण व्यवस्थेचं मोठं योगदान असणार आहे. त्यादृष्टीने जागतिक दर्जाचा नागरिक घडवणारं देशाचं नवं शैक्षणिक धोरण आणलं आहे.
आजपासून नॅशनल डिजीटल हेल्थ मिशनची सुरवात करण्यात येत आहे. यामुळे भारताच्या आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती घडून येईल आणि देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या आरोग्यविषयक इतिहासाची नोंद असलेला हेल्थ आयडी दिला जाईल. तसेच सध्या कोरोनावरील ३ लसींचं काम देशात सुरु आहे. वैज्ञानिकांची परवानगी मिळताच त्याचं उत्पादन सुरू केलं जाईल. प्रत्येक भारतीयाला लस मिळेल, असे नियोजनही आम्ही केले आहे.
आपल्या शेजारी देशांसोबतचे आपले जुने सांस्कृतिक, आर्थिक संबंध अधिक वृद्धिंगत करणं हेच भारताचं धोरण आहे. आशियायी उपखंडाच्या क्षेत्रात शांतता कामय राखण्यात योगदान द्यावं, असे आवाहन मी शेजारी देशांना करतो. भारत हा शांततेसाठी जितका कटिबद्ध आहे, तितकाच स्वतःच्या देशाच्या संरक्षणासाठीही कटिबद्ध आहे.
कोरोना साथीच्या काळातही बड्या जागतिक कंपन्या भारताकडे पाहत आहेत. तसेच आत्मनिर्भर भारताची महत्वाची प्राथमिकता म्हणजे कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर करणं, देशातील शेतकऱयांना आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 1 लाख कोटी रुपयांचा 'कृषी पायाभूत सुविधा निधी' तयार करण्यात आला आहे.
पायाभूत क्षेत्रात नवीन क्रांती घडविण्यासाठी देशाच्या विविध क्षेत्रात जवळपास 7 हजार प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या पायाभूत सुविधांना मोठी मदत होईल. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन प्रकल्प राबवला जाईल. याची भारताच्या भविष्यातील वाटचालीत महत्त्वाची भूमिका असेल. त्यासाठी 110 लाख कोटीपेक्षा अधिक खर्च केला जाईल.
ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबर पोहचवलं जात आहे. 6 लाखांपेक्षा अधिक गावांमध्ये ऑप्टिकल फायबरची सुविधा पोहचवली जाईल. हजारो किलोमीटरपर्यंत हे काम होईल. 1000 दिवसांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येईल.