गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना ज्याप्रमाणे आपल्या निवासस्थानी बोलावले होते, त्याचप्रमाणे त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांनाही बोलवावे अशी मागणी असदुद्दीन ओवैसी यांनी आज केली. एआयएमआयएमचे अध्यक्ष ओवैसी आज गुजरातच्या भरुचमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्राने कृषी कायद्यांना परत घ्यावे या मागणीचाही पुनरुच्चार केला.
गुजरातमध्ये निवडणूक लढवणार ओवैसी..
गुजरातमध्ये काही दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका प्रचारसभेत ओवैसी बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधानांना "आपले हृदय मोठे करुन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घ्या" अशी विनंतीही केली. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. अहमदाबाद आणि भरुचच्या निवडणुकांमध्ये ओवैसी यांचा एमआयएम आणि भारतीय ट्रायबल पार्टी (बीटीपी) या दोन पक्षांची युती असणार आहे.
ओबामांप्रमाणेच शेतकऱ्यांचेही चहापान करा..
ज्याप्रमाणे २०१५मध्ये पंतप्रधानांनी ओबामांना आपल्या निवासस्थानी बोलावत, त्यांचे आदरातिथ्य केले होते, त्याचप्रमाणे आता मोदींनी शेतकऱ्यांनाही आपल्या निवासस्थानी बोलवावे. मोदींनी शेतकऱ्यांना आपल्या घरी बोलवत, त्यांना चहा-बिस्कीटे देत त्यांना सांगावे, की मी कृषी कायदे मागे घेत आहे. ज्यामुळे ते शेतकरी आनंदी होतील, असे ओवैसी म्हणाले. जर पंतप्रधान मोदी गरीबीतून वर आल्याचा दावा करतात, तर त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी नक्कीच समजायला हव्यात, असेही ते यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे मोदींची झोपमोड..
ते पुढे म्हणाले, की जेव्हा एखादी व्यक्ती गरीबीतून वर येते, तेव्हा इतर गरीबांना मदत करण्याचा त्याचा स्वभाव होऊन जातो. मात्र, ज्यांना गरीबांप्रती जराही सहानुभूती नाही, त्यांना गरीबांच्या अश्रूंनी काहीही फरक पडत नाही. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत, ते आमचे 'अन्नदाता' आहेत. ते शेतात कष्ट करतात, त्यामुळेच आम्हाला अन्न मिळते असेही ओवैसी म्हणाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पंतप्रधान मोदींची 'झोपमोड' झाली असावी अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा : लाल किल्ला हिंसाचारातील आरोपी सुखदेव सिंग दिल्ली पोलिसांच्या ताब्यात!