नवी दिल्ली - पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे आम्ही विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार नाही, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या गेल्या ५ वर्षातील कामगिरीवरही जोरदार टीका केली.
सुरजेवाला म्हणाले, विरोधी पक्षनेता बनण्यासाठी लोकसभेच्या १० टक्के संख्याबळ असणे गरजेचे आहे. परंतु, आमच्याकडे २ खासदार कमी आहेत ही वस्तुस्थिती आहे. आमच्याकडे पर्याप्त ५४ खासदारांचे संख्याबळ येत नाही तोपर्यंत आम्ही विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करणार नाही. कोणत्याही एका पक्षाला प्रमुख विरोधी म्हणून निवडण्याचे काम आता सरकारच्या हातात आहे. सरकारला विरोधी पक्ष हवा आहे की नाही हे त्यांच्यावरच अवलंबून आहे.
भाजपवर हल्ला चढवताना रणदीप सुरजेवाला म्हणाले, गेल्या ५ वर्षात जीडीपीचा दर सर्वात खाली घसरला आहे. बरोजगारांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. यातच अमेरिकेने ५ जूनला भारताचा विशेष व्यापार दर्जा समाप्त करण्याची घोषणा केली आहे. यामुळे भारताच्या निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होवून बेरोजगारी आणखीन वाढणार आहे.