हैदराबाद - रस्त्याच्या कोपऱ्यावर किंवा कचराकुंडीजवळ फेकून दिलेल्या या निष्पाप अनाथ मुलांच्या हक्कांसाठी हैदराबादमध्ये 8 ते 9 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये महाराष्ट्रातील अनाथांना आरक्षण मिळवून देणाऱ्या अमृता करवंदे यांनी देखील हजेरी लावली. अनाथ मुलांसाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत, असे त्या म्हणाल्या.
अमृता करवंदे यांनी महाराष्ट्रातील अनाथांना आरक्षण देण्यासाठी लढा दिला. त्यांच्या लढ्याला यश मिळाले आणि महाराष्ट्रा सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये अनाथांसाठी एक टक्का आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला. तेलंगाणा राज्यामध्ये देखील अनाथांना आरक्षण मिळावे यासाठी लढा सुरू आहे. अनाथ मुलांकडे कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनाथ मुलांच्या भावी आयुष्यात अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी केंद्र सरकारने योजना करायला हव्यात, असे अमृता करवंदे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाल्या.