नवी दिल्ली - राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यात पाचच महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपला मात खावी लागली होती तर काँगेसने सरकार स्थापन केले. या राज्यांच्या निकालावरुन येथील लोकसभा निवडणुकीत असेच चित्र पाहायला मिळेल असे वाटत असतानाच भाजपने पुन्हा मुसंडी मारली आहे.
राजस्थानमधील लोकसभेच्या सर्व २५ जागांवर भाजप व त्यांच्या मित्र पक्षांनी वर्चस्व राखले. यात भाजपला २४ तर मित्रपक्ष राष्ट्रीय लोकत्रांतिक पार्टीला एक जागा मिळाली. विधानसभा निवडणूका जिंकूनही काँग्रेसचे 'मिशन-२५' फेल झाले. भाजपने २०१४ प्रमाणे लोकसभेच्या २५ जागा मिळवल्या.
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकांत विजय मिळवूनही काँग्रेसला लोकसभा निवडणकीत सातत्य राखता आले नाही. काँग्रेसमधील बहुतांश मोठ्या नेत्यांचा या निवडणूकीत पराभव झाला. भाजपच्या विजयानंतर मध्यप्रदेशमध्ये गुरुवारी पक्ष कार्यालयात २०१४ सारखेच चित्र पहायला मिळाले. मोदी यांच्या लाटेत काँग्रेस वाहून गेली. या लाटेत राजधानी भोपाळमधून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी हरवले. ज्योतिरादित्य सिंधिया यांचा पराभव डॉ. के.पी. यादव यांनी केला.
छत्तीसगडमध्येही पंतप्रधान मोदी यांना असलेला जनाधार पाहायला मिळाला. राज्यातील एकूण ११ लोकसभा जागांपैकी भाजपला ९ जागांवर विजय मिळाला. राज्यातील बस्तर आणि कोरबा या जागा वगळता भाजपने सर्व जागा मिळवल्या. छत्तीसगड राज्याची निर्मीती झाल्यानंतर २००४, २००९, २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ११ पैकी १० जागांवर विजय मिळवला होता. २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर राज्यातील परिस्थितीत बदल झाल्याचे पहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ९० पैकी ६८ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपने १५ जागांवर विजय मिळवला होता.