वाशिम- राज्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. त्यानंतर शनिवारी रात्री कारंजा तालुक्यातील धनज परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे धनज गावाजवळ असलेल्या नाल्याला पूर आला. त्यामुळे नाल्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे. याच पुलावरून बैलगाडी वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये शेतकऱ्याला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. मात्र २ बैल आणि एका वासराला वाचविण्यात ग्रामस्थ अपयशी ठरले आहेत.
पुरात वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याला गावकऱ्यांनी वाचवले ; २ बैलांसह वासराचा मृत्यू
पुलावरून एक शेतकरी बैलगाडीवर जात होता. मात्र, त्या शेतकऱ्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या बैलगाडीसह शेतकरी वाहून जाऊ लागला होता.
सुलतान खान मुनिर खान असे या वाचवलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. कारंजा तालुक्यात पावसाने जोरजार हजेरी लावली आहे. या पावसामुळे परिसरातील ओढे नाले खळाळून वाहू लागले आहेत. दरम्यान, नाल्या आलेल्या पुरामुळे येथील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यातच शेतीच्या कामासाठी शेताकडे जाणाऱ्या खान यांची बैलगाडी पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात वाहू लागली.
दरम्यान बैलगाडी वाहून जात असल्याचे पाहताच त्यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी शेख यांना बाहेर काढले. मात्र, दोन बैल आणि एका वासराचा मृत्यू झाला आहे.