वर्धा - जिल्ह्यातील निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे प्रकल्पाचे 31 गेट खुले करून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या सोबतच धरणाच्या वरच्या भागात असणारे अप्पर वर्धा धरणाचेही गेट खुले करण्यात आले आहेत. सद्या धरण साठ्याच्या पाणी पातळीच्या अनुषंगाने नियोजन केले जात आहे.
वर्ध्यातील वरुड बगाजी येथे अमरावती-वर्धा जिल्ह्याच्या मधोमध निम्न वर्धा प्रकल्प आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे आज सकाळी 9 वाजता 31 गेट 1.3 मीटरने वर उचलण्यात करण्यात आले आहेत. यातून 3 हजार 466 क्युसेक पाण्याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. सद्या पावसाने उघड दिली असती तरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यामुळे अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्यात येत आहे. यावर सर्व नियोजन अवलंबून आहे.
दोन प्रकल्पामधून पाणी सोडल्याने, देउरवाडा ते अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर जोडणारा पुलावरून पाणी वाहू लागले आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला. त्यामुळे पर्यायी मार्ग सुरू करण्यात आला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुलावरुन वाहतूक करु नये, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. याशिवाय नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे.