सिंधुदुर्ग - जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. देवगड तालुक्यात अति वृष्टीमुळे एक घर कोसळले आहे. तर कुडाळमधील भंगसाळ नदीला पूर आल्यामुळे पावशी गावातील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. तर पाणी आल्याने सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
देवगड तालुक्यात घरांचे नुकसान
देवगड तालुक्यात अतिवृष्टीमुळे कोर्ले गावात घरावर घर कोसळून सुमारे ६ लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील माणसे या दुर्घटनेत बालंबाल वाचली. तर नाद गावामध्येही तीन घरांचे छप्पर उडाले. नाद गावातील भिकाजी पांगम यांच्या घरावरचे पत्रे उडाले तर श्रीकांत पोयरेकर व शांताराम बंडवे यांच्या घरावरची कौले उडाली. तर कोर्ले बाणेवाडी येथील शांताराम सोनू बाणे यांच्या मातीच्या घराची भिंत खाली घर असलेल्या प्रकाश धकटू बाणे यांच्या घरावर कोसळली. यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्ग – कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प
गगनबावडा घाट मार्ग कोकण व घाटमाथा यांना जोडणारा प्रमुख मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर करूळ घाट आहे. परंतु तो घाट खचल्याने या मार्गावरील वाहतूक गेली दहा दिवस बंद आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली होती. त्यातच गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीत गगनबावडा तालुक्यातील मांडुकली व खोकुर्ले गावात मार्गावर पाणी भरल्याने हा मार्ग बंद झाला आहे.