सातारा - जरंडेश्वर साखर कारखान्याला खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह संचालक मंडळाच्या मान्यतेनेच कर्जपुरवठा करण्यात आला. आरबीआय आणि नाबार्डच्या नियमानुसारच सर्व प्रक्रिया पार पडली. जरंडेश्वरचे हप्तेही वेळेत बँकेला प्राप्त झाले आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले 'जरंडेश्वर'च्या कर्जाला संचालक मंडळाची मान्यता
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, उदयनराजेंचे सल्लागार त्यांना चुकीचा सल्ला देत आहेत. बँकेचे कामकाज अत्यंत उत्तमरित्या सुरू असून संपूर्ण भारतात ही बँक नावाजलेली आहे. त्यामुळे काहीही बोलून बँकेची बदनामी करणे थांबवावे. जरंडेश्वर कारखान्याला कर्ज देताना संचालक मंडळाची मान्यता घेण्यात आली आहे. कारखान्याला दिलेले कर्ज हे नियमित परतफेड केले जात आहे. बँकेचे ऑडिट नाबार्डच्या माध्यमातून वेळोवेळी होत असते. बँकेत जर चुकीचे काही घडले असते तर बँकेचे कौतुक देशभर झाले नसते.
हा तर जाणीवपूर्वक अपप्रचार
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी ग्रुप क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स पॉलिसीबाबत काही संचालक चुकीची व तथ्यहीन माहिती सांगून शेतकरी सभासदांची दिशाभूल करीत आहेत. बँक कायम शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून विविध योजना राबवत असून त्याचा लाभ अनेक सभासद व खातेदारांना होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोट्या व अपुऱ्या माहितीच्या आधारे काही संचालक जाणीवपूर्वक अपप्रचार करीत आहेत, असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले.
विमा कंपन्यांकडे पाठपुरावा
विमा पॉलिसीचे धोरण खूप मोठे असल्याने विमा कंपन्यांशी चर्चा करणे गरजेचे होते. बँकेने राष्ट्रीयकृत विमा कंपनी कडून स्पर्धात्मक कोट घेतले. राष्ट्रीयकृत विमा कंपनीना अटी आणि शर्तींसह दरपत्रक, आजारांची यादी, शेतकऱ्यांची यादी देण्यात आली. बँक दरपत्रक मिळवण्यासाठी विमा कंपन्यांकडे वारंवार पाठपुरावा करत आहे. पण, सध्याची कोरोना परिस्थिती आणि सुमारे पाच लाख व्यक्ती असणारी एवढी मोठी पॉलिसी असल्यामुळे विमा कंपन्या त्यावर अभ्यास करून कोटेशन देतो, असे वेळोवेळी सांगत होत्या. या पॉलिसीसाठी बँकेच्या संचालक मंडळाने पूर्वीचा अनुभव पहाता साधारणपणे 10 ते 12 कोटी खर्च ग्राह्य धरला होता. तथापी सध्याच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीमुळे भारतातील सर्व विमा कंपन्यांनी आरोग्य विम्याचे दर खूप मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. त्यामुळे प्रिमियम दर वाढला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा -सातारा जिल्हा बँक निवडणूक : संचालकांमुळे सभासदांचे नुकसान, उदयनराजेंचा आरोप