महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 12, 2019, 12:39 PM IST

Updated : Apr 13, 2019, 10:40 AM IST

ETV Bharat / state

शिवसेनेच्या धनुष्याला राणेंचा स्वाभिमान देणार का धक्का ? की काँग्रेसचे जातीय समीकरण चालणार

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून १२ उमेदवार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण मुख्य लढत आहे ती महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे यांच्यात.

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

रत्नागिरी - रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघातून १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण मुख्य लढत आहे ती महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे यांच्यात. तर आघाडीकडून नविनचंद्र बांदिवडेकर हे मैदानात उतरलेत.


२०१४ ची परिस्थिती

२०१४ च्या निवडणुकीमध्ये युतीचे विनायक राऊत जवळपास दीड लाख मतांनी निवडून आले होते. त्यावेळी निलेश राणे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते. यावेळी मात्र, निलेश राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून रिंगणात आहेत. त्यात शिवसेना-भाजपचे मनोमिलन झाले असले, तरी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते कितपत मदत करतील याबाबत साशंकताच आहे. त्यामुळे शिवसेनेला आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ


काँग्रेसचे जातीय समीकरण

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्राबल्य आहे ते कुणबी समाजाचे. त्याखालोखाल मराठा समाज, आणि भंडारी समाजाचे प्राबल्य आहे. यावेळी मात्र, काँग्रेसने जातीचे कार्ड फेकले आहे. अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र, सनातनशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांची उमेदवारी धोक्यात आली होती. पण हायकमांडकडून त्यांना अभय मिळाले आहे. पण या वादामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यामुळे आता बांदिवडेकर यांना नेमकी किती मते मिळतात हेही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

एनडीएचे घटक पक्षच आमने - सामने

नारायण राणे आणि शिवसेनेचे हाडवैर संपूर्ण राज्याला परिचित आहे. त्यामुळेच एनडीएचा घटक पक्ष असलेल्या नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेविरोधात रणशिंग फुंकले आहे. युती झाली तरी आपण स्वतंत्रच लढणार असे युती होण्यापूर्वीच राणेंनी जाहीर केले होते. त्यानुसार राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निलेश राणे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पण निलेशला मत म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत असे नारायण राणे जाहीरपणे सांगत भाजपचे कौतुकही करत आहेत. पण हे करत असताना शिवसेनेवर मात्र जोरदार आसूड ओढत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना देखील राणेंवर शाब्दिक वार करताना पाहायला मिळतेय. राणे-शिवसेनेच्या शाब्दिक चकमकी अगदी एकमेकांच्या शिक्षण काढण्यापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे एनडीएचे हे दोन घटक पक्ष समोरासमोर उभे ठाकल्याचे देशातील बहुधा पहिलेच उदाहरण असावे.

मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न

2014 च्या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा होता जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प. तर यावेळी कळीचा मुद्दा ठरला असता तो नाणार रिफायनरी प्रकल्प. मात्र, युती करताना शिवसेनेने हा प्रकल्प रद्द करण्याची अट भाजपसमोर ठेवली होती. त्यानंतर या प्रकल्पाची अधिसूचना देखील सरकारकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेची ती एक जमेची बाजू आहे.


मात्र, मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण आणि कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राशी जोडणे, बंदरांचा विकास असे अनेक मुद्दे या निवडणुकीत आहेत.
त्याचबरोबर बेरोजगारी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दहावी, बारावी झाली की कोकणातला तरुण मुंबईची वाट धरतो. कारण इथे रोजगाराचा अभाव आहे. विनाशकारी प्रकल्प कोकणी जनतेला नको आहेत. मात्र, इथल्या निसर्गाला धक्का न लावता जर उद्योगधंदे आले तर जनता त्याचं स्वागतच करेल. दरम्यान, मच्छिमारांचा प्रश्न, आंबा काजूसाठी हमीभाव, पर्यटन सुविधांचा अभाव असे अनेक प्रश्न या मतदारसंघात आहेत.


पक्षीय बलाबल

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात ६ विधासभा क्षेत्राचा समावेश होतो. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि राजापूर हे तर सिंधुदूर्गातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या विधासभा मतदारसंघाची समावेश होतो. यापैकी ६ ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व आहे तर एका ठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व आहे.


कुडाळ - वैभव नाईक (शिवसेना)
सावंतवाडी - दीपक केसरकर (शिवसेना)
राजापूर - राजन साळवी (शिवसेना)
रत्नागिरीत - उदय सामंत (शिवसेना)
चिपळूण - सदानंद चव्हाण (शिवसेना)
कणकवली - नितेश राणे (काँग्रेस)

कणकवली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर नितेश राणे निवडून आले होते. मात्र, आता त्यांच्या वडिलांनी म्हणजेच नारायण राणे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षालाच नितेश राणे यांचे समर्थन आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघातून विनायक राऊत यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते. विनायक राऊत यांना या विधानसभा मतदारसंघातून निलेश राणे यांच्यापेक्षा 41 हजार 630 मताधिक्य जास्त मिळाले होते. तर कुडाळमधून 21 हजार 835, कणकवलीमधून 1 हजार 607, चिपळूणमधून 31 हजार 140, रत्नागिरीमधून 31 हजार 565, तर राजापूरमधून 22 हजार 245 मताधिक्य विनायक राऊत यांना मिळाले होते.


मतदारसंख्या

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात गेल्या वेळी (2014) 65.69 टक्के मतदान झाले होते. 13 लाख 67 हजार 362 मतदारांपैकी 8 लाख 99 हजार 417 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यावेळी मतदारांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे नवमतदारसुद्धा निर्णायक ठरणार आहेत. यावेळी एकूण 14 लाख 41 हजार 936 मतदार आहेत. यापैकी पुरुष 7 लाख 6 हजार 318 तर स्त्रिया 7 लाख 35 हजार 609 मतदार आहेत. या मतदारसंघात एकूण 1 हजार 952 मतदान केंद्र आहेत.


उमेदवारांच्या जमेच्या बाजू

महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत हे शांत आणि संयमी स्वभावाचे असून लोकांशी जनसंपर्क अशी त्यांची ओळख आहे. अनेक पदाधिकाऱ्यांशी त्यांचा वैयक्तिक संपर्क असतो. नाणार प्रकल्प रद्द होण्यामागेही त्यांची भूमिका महत्वाची होती.

तर दुसरीकडे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे हे अत्यंत आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. गेल्या वेळी जरी त्यांचा पराभव झाला असला तरी न खचता गेल्या ५ वर्षांत त्यांनी अनेक प्रश्नांवर, समस्यांवर आवाज उठवला आहे. विशेषतः त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले होते. त्यात नारायण राणे यांच्या नावाच्या वलयामुळे निलेश राणे यांची ताकद वाढलेली वाटते. तर नविनचंद्र बांदिवडेकर हे जरी नवखे असले तरी काँग्रेसचे पारंपारिक मतदार ही त्यांची जमेची बाजू आहे.

या मतदारसंघात युतीची ताकद जास्त असली तरी नारायण राणेंनी मुलगा निलेश राणेंसाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर भाजपचे मतदार शिवसेनेला कितपत मदत करणार हाही एक प्रश्न आहे. त्यामुळे जनता पुन्हा विनायक राऊत यानांच खासदार करणार की निलेश राणेंना दिल्लीला पाठवणार हा येणारा काळच ठरवेल.

Last Updated : Apr 13, 2019, 10:40 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details