रत्नागिरी- लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडताना पाहायला मिळत आहे. या लोकसभेच्या निवडणुकीत सध्या मोदी विरुद्ध राहूल गांधी यांच्यातच खरी टफ फाईट माणली जाते. त्यामुळे एनडीए विरुद्ध आघडी अशी लढत ठिकठिकाणी पाहायला मिळणार आहे. मात्र, या लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएमधीलच दोन घटक पक्ष आमने सामने आलेत. असा कोणता मतदार संघ आहे, की ज्या ठिकाणी एनडीएचे घटक पक्ष आमने-सामने येवून निवडणूक लढतायत. त्याबाबत ईटीव्ही भारतचा हा विशेष वृत्तांत...
लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामात एनडीए विरुद्ध आघाडी अशी लढत होणार आहे. मात्र, एनडीएचे दोन घटक पक्षच सध्या निवडणुकीत आमने सामने आलेत. देशात असा एकमेव मतदारसंघ आहे, जिथे एनडीएच्या घटकपक्षांचेच उमेदवार आमने सामने आले आहेत. हा मतदार संघ आहे कोकणातील रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघ.. या ठिकाणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि शिवसेना निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही पक्ष मोंदीचे हात बळकट करणार असल्याचा दावा करत एनडीएत सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष असलेले नारायण राणे भाजपच्या कोट्यातून खासदार झालेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) चा घटक पक्ष आहे. मात्र, युती झाल्याने रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. परिणामी नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सध्या निलेश राणेंना मत म्हणजे मोदींना मत असा प्रचार करून नारायण राणे चांगलीच बॅटिंग करतायत.
तर एनडीएचा दुसरा घटक पक्ष शिवसेना आहे. शिवसेनेचे विनायक राऊत हे या मतदार संघातून उमेदवार आहेत. स्वाभिमान विरुद्ध शिवसेना अशी एनडीएमधील घटक पक्षांमध्ये ही निवडणूक होतेय. राणे आणि शिवसेना यांचे समीकरण न जुळणारे आहे. त्यामुळे माझ्या मुलाला मत हे मोदींना मत असल्याचा राणेंचा डंका या निवडणुकीत 'की फॅक्टर' ठरणारा आहे. त्यामुळे शिवसेना सुद्धा स्वाभिमान पक्ष हा एनडीएचा घटक आहे का? या प्रश्नावर बोलण्यास तयार नाही. शिवसेनेचे उमेदवार असलेले राऊत देखील याचं उत्तर मुख्यमंत्री कोकणात येवून देतील असं सांगतायत.