महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नारायण राणेंनी हट्ट सोडला नाही, रत्नागिरीत एनडीएच्याच दोन घटक पक्षांत लढत

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एनडीएचेच दोन घटकपक्ष आले आमने-सामने... शिवसेना विरुद्ध-महाराष्ट्र स्वाभिमानमध्ये रंगतोय सामना... मोंदीचे हात बळकट करणार असल्याचा दोन्हीही पक्षांचा दावा

By

Published : Apr 5, 2019, 2:08 PM IST

Updated : Apr 5, 2019, 8:19 PM IST

एनडीएचेच दोन घटक पक्ष आमने-सामने


रत्नागिरी- लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडताना पाहायला मिळत आहे. या लोकसभेच्या निवडणुकीत सध्या मोदी विरुद्ध राहूल गांधी यांच्यातच खरी टफ फाईट माणली जाते. त्यामुळे एनडीए विरुद्ध आघडी अशी लढत ठिकठिकाणी पाहायला मिळणार आहे. मात्र, या लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएमधीलच दोन घटक पक्ष आमने सामने आलेत. असा कोणता मतदार संघ आहे, की ज्या ठिकाणी एनडीएचे घटक पक्ष आमने-सामने येवून निवडणूक लढतायत. त्याबाबत ईटीव्ही भारतचा हा विशेष वृत्तांत...

एनडीएचेच दोन घटक पक्ष आमने-सामने,


लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामात एनडीए विरुद्ध आघाडी अशी लढत होणार आहे. मात्र, एनडीएचे दोन घटक पक्षच सध्या निवडणुकीत आमने सामने आलेत. देशात असा एकमेव मतदारसंघ आहे, जिथे एनडीएच्या घटकपक्षांचेच उमेदवार आमने सामने आले आहेत. हा मतदार संघ आहे कोकणातील रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघ.. या ठिकाणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि शिवसेना निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही पक्ष मोंदीचे हात बळकट करणार असल्याचा दावा करत एनडीएत सहभागी झाले आहेत.


महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष असलेले नारायण राणे भाजपच्या कोट्यातून खासदार झालेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) चा घटक पक्ष आहे. मात्र, युती झाल्याने रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. परिणामी नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सध्या निलेश राणेंना मत म्हणजे मोदींना मत असा प्रचार करून नारायण राणे चांगलीच बॅटिंग करतायत.

तर एनडीएचा दुसरा घटक पक्ष शिवसेना आहे. शिवसेनेचे विनायक राऊत हे या मतदार संघातून उमेदवार आहेत. स्वाभिमान विरुद्ध शिवसेना अशी एनडीएमधील घटक पक्षांमध्ये ही निवडणूक होतेय. राणे आणि शिवसेना यांचे समीकरण न जुळणारे आहे. त्यामुळे माझ्या मुलाला मत हे मोदींना मत असल्याचा राणेंचा डंका या निवडणुकीत 'की फॅक्टर' ठरणारा आहे. त्यामुळे शिवसेना सुद्धा स्वाभिमान पक्ष हा एनडीएचा घटक आहे का? या प्रश्नावर बोलण्यास तयार नाही. शिवसेनेचे उमेदवार असलेले राऊत देखील याचं उत्तर मुख्यमंत्री कोकणात येवून देतील असं सांगतायत.


दरम्यान, भाजपचे नेते आणि कार्यकर्ते सुद्धा सेनेच्या व्यासपीठावर आहेत. मात्र, भाजपमधली खदखद काही प्रमाणात शिवसेनेच्या विरोधात आजही आहे. त्यामुळे सेनेच्या व्यासपीठावर येणारे भाजपचे नेते सुद्धा सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देतायत. मात्र सेनेचा प्रतिस्पर्धी असलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे किंवा नारायण राणेंवर कोणतीही टीका करत नसल्याचेही चित्र इथं पाहायला मिळतंय.

त्यामुळे देशातील लोकसभेच्या संपूर्ण निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदूर्ग हा एकमेव असा मतदार संघ आहे, जिथे एनडीएचे घटक पक्ष निवडणुकीत आमने सामने आलेत. त्यामुळे इथली निवडणूक खऱ्या अर्थांने रंगतदार असणार आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवारही रिंगणात उतरला आहे. मात्र, खरी लढत ही सेना आणि राणेंच्यात होईल हे निश्चित.


नारायण राणे यांनी युती झाली असली तरी आपण स्वतंत्रच लढणार असं युती होण्यापूर्वीच जाहीर केलं होतं.. त्यानुसार राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निलेश राणे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. पण निलेशला मत म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत असं नारायण राणे जाहीरपणे सांगतात आणि भाजपचे कौतुककही करतात. पण हे करत असताना शिवसेनेवर मात्र जोरदार आसूड ओढत आहेत.


तर दुसरीकडे शिवसेना देखील राणेंवर शाब्दिक वार करताना पाहायला मिळतेय. राणे-शिवसेनेच्या शाब्दिक चकमकी अगदी एकमेकांच्या शिक्षण काढण्यापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे एनडीएचे हे दोन घटक पक्ष समोरासमोर उभे ठाकल्याचं देशातील बहुधा पहिलंच उदाहरण असावं. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष याच लढतीकडे लागल्याचे चित्र पाहायला मिळतेय.

Last Updated : Apr 5, 2019, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details