पालघर - राष्ट्र सेवा दल पालघर तालुक्यातर्फे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 'एकलव्य गौरव पुरस्कार' देऊन या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या पुरस्कार कार्यक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे. पालघर तालुक्यातील शासकीय अनुदानित विद्यालयातील ५३ विद्यार्थ्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. पालघरच्या मोरे भंडारी समाज भवन सभागृहात रवींद्र वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत एकलव्य गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
ध्येय साध्य करण्यासाठी आपली आवड आणि मर्यादा समजून घेऊन परंपरागत शिक्षण घेण्यापेक्षा जरा हटके मार्ग स्वीकारा. त्याला दृष्टिकोन, कौशल्य आणि मेहनतीची भक्कम जोड देण्याची गरज आहे. असा कानमंत्र व्यवस्थापन गुरू व मनुष्यबळ विकास तज्ज्ञ रवींद्र वाघमारे यांनी एकलव्य गौरव पुरस्कार कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिला.