महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये भीषण पाणीटंचाई.. मुखेड तालुक्यात ६० टँकरने पाणीपुरवठा, उपाययोजनाबाबत प्रशासन उदासीन

मुखेड तालुक्यात दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून ६० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

By

Published : Jun 12, 2019, 3:13 PM IST

Updated : Jun 12, 2019, 4:03 PM IST

पाणी भरण्यासाठी टँकरवर होणारी गर्दी

नांदेड - मुखेड तालुक्यात जूनच्या पंधरवड्यात विविध जलाशयांनी तळ गाठला आहे. त्यात बाष्पीभवनाने अधिकची भर पडली असून तालुक्यात सर्वत्र पाणी टंचाईचे भीषण दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून ६० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

पाणी भरण्यासाठी टँकरवर होणारी गर्दी

मुखेड तालुक्यात न भूतो भविष्यती पाणी व चारा टंचाईसह दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. १९७२ पेक्षाही दुष्काळाची दाहकता तीव्र असल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगत आहेत. जलस्त्रोतांनी तळ गाठल्याने घागरभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करताना अबालवृद्ध दिसून येत आहेत. टँकरची मागणी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मृग नक्षत्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वांच्या नजरा पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे भिडल्या आहेत. मात्र, अद्यापतरी पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करत टँकरच्या प्रतीक्षेत भांड्यांच्या लांबच-लांब रांगा शहरासह वाडी-तांड्यावर लागत आहेत.

पाणीटंचाई उपाययोजनेंतर्गत प्रशासनाकडून २३२ पैकी १७१ अधिग्रहणचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तसेच ६० टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यात आबादी नगर तांडा, चव्हाणवाडी खैरका, खैरका वाडी,संगमवाडी यशवंत नगर, रुपचंद तांडा, सेवादासनगर, लखु गंगाराम तांडा, अर्जुन तांडा, लखु तांडा, सोसायटीतांडा, काळू तांडा, लोभा तांडा, रेखा सखू तांडा, प्रकाश नगर,बेरळी बु, फतू तांडा, तुळशीराम तांडा, धर्म नगर,तुपदाळ खु, तुपडाळ बु, बेरळी खु, बेरळी बु, मंग्याळ, बसस्टॅण्ड पेठ गल्ली, निजाम तांडा, बाहाळी, बोरगाव,जामखेड, माकणी, भवानी तांडा, ताईबाई तांडा, जांब खु,जेसू तांडा, बाजगीर वाडी, वाल्मीकनगर, राठोडवाडी,देवला तांडा, संघर्ष नगर, बेरळी बु, होंडाळा, सन्मुखवाडी, मुक्रमाबाद, जांभळी तांडा, जांभळी, फिपकटा, दापका गुं, शिरूर दबडे, येवती, जांब आणि वडगाव, विठ्ठलवाडी, वाल्मिकवाडी, किसनतांडा, जांभळी तांडा,हिरानगर तांडा, हिरानगर, लोकडोबा नगर, कबनूर तांडा,जर्मन तांडा, आंदेगाव तांडा, फुलेवाडी, कुत्ता तांडा, भवानीनगर, शिवाजीनगर तांडा, देवीनगर तांडा, प्रभुनगर,सांगवी(ब), सखाराम तांडा, जाहुर तांडा, भवानी तांडा, ताईबाई तांडा, हिपळणारी, हिरानगर रोकडोबानगर, कबनूर तांडा, हिरानगर तांडा, सावळी तांडा, देगाव, अंतरंगाव, बोरी तांडा, तांदळी तांडा, मारोतीनगर तांडा आणि शेळकेवाडी या गावात ६० टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

तालुक्यात विहीर, बोअर अधिग्रहण प्रस्तावाला जूनच्या आरंभी मंजुरी देण्यात आली आहे. पाणी टंचाईने तालुका होरपळत असताना एवढ्या उशिरा अधिग्रहण प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार होती तर जानेवारी ते मार्च, एप्रिल ते जून कृती आराखड्याचा काय उपयोग, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पूरक नळ योजना, विशेष नळ दुरुस्ती, विधन विहिरी दुरुस्ती, नवीन बोअर घेणे यासारखी कामे झालेली दिसून येत नाहीत. पाणी टंचाई निर्मुलनासाठी २ टप्प्यात जानेवारी ते मार्च ६ कोटी ८० लाख २० हजार आणि एप्रिल ते जून या कालावधीसाठी ३ कोटी ८८ लाख ८० हजारांचा कृती आराखडा मंजूर झाला. मात्र, हा आराखडा केवळ सोपस्कार असून प्रत्यक्ष बजेट किती आले याबाबत विचारणा होत आहे.

Last Updated : Jun 12, 2019, 4:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details