नांदेड : काॅंग्रेसचे नेते अशोक चव्हाण ( Congress leader Ashok Chavan ) यांनी आज नांदेड येथे पत्रकार परिषद घेताना पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, विधान परिषदेला काँग्रेसची 7 मते फुटली ( Congress split by 7 votes ), याची चौकशी करून कारवाई व्हायलाच पाहिजे. तसेच, हायकमांडनेसुद्धा याची जरूर दखल घ्यावी. कारण यामुळे पक्षाला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. या फुटीर आमदारांवर निश्चित कारवाई झालीच पाहिजे.
बहुमत चाचणीवेळी झाला उशीर : बहुमत चाचणी वेळी उशीर होण्याचे कारण विचारले असता, अशोक चव्हाण यांनी सांगितले की, यात शंका घेण्याचे कुठलेही कारण नाही, ट्रॅफिकमुळे उशीर झाला. बहुमत चाचणी वेळी अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या काही आमदारांना उशीर झाल्याने काँग्रेस हायकमांडने याची गंभीर दखल घेतली आहे. अत्यंत महत्त्वाच्या वेळी या आमदारांना उशीर कसा झाला, असा सवाल काँग्रेस हायकमाडने उपस्थित केलाय. पण, ट्रॅफिकमुळे 3 मिनिटे उशीर झाला. अशी प्रतिक्रिया काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
माझ्यावर शंका घेण्याचे काही कारण नाही : अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना, माझ्यावर कुठलीही शंका घेण्याचे कारण नाही मला ट्रॅफिकमुळे उशीर झाला. मला केवळ 3 मिनिटे उशीर झाला. मी 3 मिनिट उशिरा पोहचल्याने कोणीही शंका घेण्यात कुठलाही अर्थ नाही. त्याचबरोबर विधिमंडळात बहुमत चाचणी ठराव प्रथम चर्चा नंतर मतदान अशी पद्धत असताना त्या दिवशी प्रथम मतदान झाले. हे फार विचित्र होते. यात फार मोठे काही गौडबंगाल नाही. विधानसभा अध्यक्ष निवडीवेळी महाविकास आघडीलाच मतदान केले, त्यामुळे शंका घेण्याचे कारण नाही, असे चव्हाण म्हणाले. ज्यांना कुणाला काय अर्थ काढायचा त्यांनी तो काढावा, असे उत्तरही चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावर दिले.