नांदेड Children Drown in Lake : एकीकडे राज्यात सर्वत्र गणेश विसर्जनाचा उत्साह पहावयास मिळतोय. तोच दूसरीकडे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात मात्र मन सुन्न करणारी घटना घडलीय. तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झालाय. बिलोली तालुक्यातील बामणी गावात ही ह्रदयद्रावक घटना घडलीय. मृतकांमध्ये दोन सख्या भावांचाही समावेश आहे. देवानंद पिराजी गायकवाड (वय १५), बालाजी पिराजी गायकवाड (वय १२), वैभव पंढरी दुधारे (वय १५) अस मृतकांची नावे आहेत.
दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू :बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बामणी येथील गावाशेजारील तलावात विसर्जन करण्यात आलेली गणपती मुर्ती तलावात पाण्यावरती आली आहे, अशी माहिती मिळाल्यावरून गावातील पाझर तलावात देवानंद गायकवाड, बालाजी गायकवाड, वैभव दुधारे व अन्य एक जण तलावाकडे पाहण्यासाठी गेले होते. तलावाजवळ आले असता तलावातील पाणी पाहून मुलांना पोहण्याचा मोह आवरला नाही. चारपैकी तीन मुले पाण्यात उतरले. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज नसल्याने तिन्ही अल्पवयीन मुलं तलावात बुडत असल्याचं दिसताच सोबत असलेल्या मुलानं गावात येऊन सांगितलं. ही बातमी गावात पसरताच गावातील काही लोकांनी पाझर तलावाकडं धाव घेतली व त्यांचा मृतदेह शोधाशोध करून बाहेर काढले. मात्र, गावकरी येईर्पर्यंत तिघांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, उपनिरीक्षक बालाजी गोणारकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतातील देवानंद व बालाजी हे दोघे सख्खे भाऊ आहेत, तर वैभव हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळं या विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर फार मोठं संकट आलंय.