मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२३ - २४ चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात रेल्वेला २.४० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या आधी २०१३ - १४ मध्ये रेल्वेला देण्यात आलेल्या निधी पेक्षा हा निधी ९ पट अधिक आहे. या निधीमधून रेल्वेतून दररोज भारतात प्रवास करणाऱ्या अडीच कोटी प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित करण्यासाठी महत्वपूर्ण आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत सीएसएमटी स्थानक मुंबई, दिल्ली रेल्वे स्थानक, अहमदाबाद रेल्वे स्थानक सारख्या मोठया आणि छोट्या अशा १ हजार २७५ रेल्वे स्थानकाच्या विकास कामाला गती मिळणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
लातूरमध्ये वंदे भारत तयार होणार :माजी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी २०१८च्या अर्थसंकल्पात लातूर रेल्वे कारखान्याची घोषणा केली होती. मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील लातूरमध्ये रेल्वे विकास निगम लिमिटेडने (आरव्हीएनएल) या कारखान्याची उभारणी केली. कारखान्याचे काम पूर्ण झाले असले तरी देशातील चौथ्या आणि राज्यातील पहिल्या रेल्वे कारखान्यातून हजारो रोजगार निर्मितीची प्रतीक्षा कायम होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजन असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जागतिक पातळीवरील सुविधा असल्या वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचे प्रोडक्शन वाढवले जाणार आहे. याकरिता इंटीग्रल कोच फैक्ट्री (आईसीएफ), चेन्नई व्यतिरिक्त महाराष्ट्रातील लातूर, हरयाणातील सोनीपथ आणि उत्तरप्रदेशातील रायबरेली कोच फॅक्टरीमध्ये वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसची निर्मिती करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतल्याचे वैष्णव यांनी सांगितले.