मुंबई- शिवडी पूर्व पश्चिम भागातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी उभारण्यात आलेला पादचारी पूल धोकादायक असल्यामुळे 3 वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या वतीने तोडण्यात आला. त्यानंतर हा पूल बांधून देऊ, असे पालिका व नगरसेवकांकडून सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे लोकांना जीव मुठीत घेऊन पूल ओलांडावा लागतो.
3 वर्षांपूर्वी शुभारंभ, मात्र अद्याप सापडेना शिवडी पूल पुनर्बांधणीला मुहूर्त
या ठिकाणी पुलाचे काम न झाल्यामुळे लोक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. हा पूल ज्या मार्गावर आहे मार्ग तो हायवे आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
शिवडी पादचारी पूल हा पूर्व भागात आहे. हा पूल 3 वर्षांपूर्वी मोडकळीस आला होता. त्यामुळे हा पूल पाडून पुनर्बांधणी करू, असे सांगण्यात आले होते. या पुलाचे भूमिपूजन शिवसेना स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ व आमदार अजय चौधरी यांच्या हस्ते 3 वर्षांपूर्वी झालेही होते. मात्र, आजही या ठिकाणी या पूलाच्या कामला मुहूर्त लागला नाही. विशेष म्हणजे या पुलाच्या शेजारी सुरु असलेली इमारत एक वर्षात तयार झाली आहे.
शिवडी पादचारी पूल परेल व शिवडी या विभागाला जोडणारा आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. त्याचबरोबर या मार्गाने केईएम, टाटा रुग्णालय, वाडिया रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या पूलाचे काम लवकरात-लवकर पूर्ण व्हावे, अशी नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.