मुंबई - कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊनमध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द केली असून अधिक काटेकोरपणे लॉकडाऊन पाळले जावे, असे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. २० एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे राज्य सरकारने ठरविल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरू केले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या लाईव्ह प्रसारणातही नाराजी व्यक्त केली होती. तसेच निर्बंध न पाळल्यास शिथिलता रद्द केली जाईल, असा इशाराही दिला होता.
लॉकडाऊन संदर्भात राज्य शासनाने १७ एप्रिलला काढलेल्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील नव्याने शिथिल केलेल्या बाबी रद्द करणारी दुरुस्ती आज करण्यात आली आहे. मुंबई महानगर आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी ती लागू असेल. उर्वरित राज्यात १७ एप्रिलच्या सूचनेप्रमाणे शिथिलता राहील.