मुंबई- मुंबईत २९ एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. जास्तीत जास्त मतदान आपल्या पारड्यात पडावे, यासाठी नेतेमंडळी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. काल भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त एकनाथ गायकवाड, मिलींद देवरा, राहुल शेवाळे, मनोज कोटक तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी चैत्यभूमी येथे जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.
मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे त्याप्रमाणे लोकांमध्ये दिसण्याची कोणतीही संधी उमेदवार सोडत नाहीत. काल रात्रीपासूनच आंबेडकर जयंतीच्या जल्लोषाला सुरुवात झाली. अनेक उमेवारांनी विविध परिसरातील बुद्ध विहारात जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. ईशान्य मुंबईत निहारिका खोदले, संजय पाटील यांच्या पत्नी पल्लवी पाटील, मनोज कोटक यांनी विक्रोळी येथील बुद्धविहारात हजेरी लावली.