मुंबई:स्वच्छता यात्रेची सुरुवात अंधेरी पश्चिम येथील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था येथून झाली. यात्रेच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्य स्वच्छता अभियानाचे राज्य समन्वयक सुभाष दळवी यांनी मुंबईतील स्वच्छता विषयक आव्हाने आणि विविध अभिनव उपाय योजना राबवून त्या आव्हानांवर करण्यात आलेली मात याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यादरम्यान भेट देण्यात येणाऱ्या ठिकाणांची संक्षिप्त माहिती आणि नियोजन याबाबत देखील त्यांनी माहिती दिली.
महिला बचत गटाचा गौरव:रगडापाडा परिसरात श्री आस्था महिला बचत गट यांच्या पुढाकाराने कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प अत्यंत सक्षमपणे सुरू आहे. या प्रकल्पात परिसरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात येते. त्याचबरोबर स्वच्छता यात्रेने टाकाऊ वस्तूंपासून बनवण्यात आलेल्या शोभेच्या वस्तूंची माहिती जाणून घेतली. याच ठिकाणी गुजरातहून आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी आणि रगडा पाडा परिसरातील मान्यवरांनी एकत्रितपणे स्वच्छतेची शपथ घेतली. विशेष म्हणजे, ही शपथ मराठी भाषेतून घेण्यात आली. या परिसरातील स्वच्छता, साफसफाई, सुशोभीकरण आणि कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प पाहून प्रभावित झालेल्या गुजरातच्या पाहुणे मंडळींनी आस्था महिला बचत गटाच्या मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.