मुंबई- शहर आणि उपनगरांमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. पावसामुळे मुंबईकरांची व चाकरमान्यांचे हाल झालेले पाहायला मिळत आहेत. यातच असल्फा मेट्रो स्थानका खालील गटार तुंबले असल्याने पाणी रस्त्यावर मोठया प्रमाणात बाहेर येत आहे. त्यामुळे रस्त्यावर तळे साचले आहे.
मुंबईतील वाहतूक जागोजागी धीम्या गतीने चालू असलेली पाहायला मिळत आहे. आज (बुधवारी) सकाळ पासूनच उपनगरात जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचत आहे. आजच्या पावसाने महानगरपालिकेकडून केला जाणारा पावसाळापूर्व नालेसफाईचा दावा फोल ठरत आहे. हे आजच्या पावसातून उपनगरात दिसून येत आहे. या पावसात तुंबलेल्या नाल्यातून बाहेर प्लास्टिक व गाळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात येत आहे.