मुंबई - दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व केरळच्या माजी राज्यपाल शीला दीक्षित यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक अत्यंत अनुभवी, निष्ठावान व सुसंस्कृत नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
पक्षाने निष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व गमावले, शीला दीक्षित यांच्या निधनावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया शीला दीक्षित यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, त्या आयुष्यभर काँग्रेस विचारधारेशी एकनिष्ठ राहिल्या. त्यांनी काँग्रेस पक्ष संघटनेत विविध पदे यशस्वीरित्या सांभाळली. खासदार, केंद्रीय मंत्री म्हणून दिल्लीच्या विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्या दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा असताना त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मोठा विजय मिळवला होता.
सलग पंधरा वर्ष त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद यशस्वीरित्या सांभाळले. दिल्लीचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम त्यांनी केले. केरळच्या राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या महिला आयोगात ५ वर्ष भारताचे प्रतिनिधीत्व करून महिलांच्या समस्येकडे संयुक्त राष्ट्राचे लक्ष वेधून घेतले होते. राजकारणासोबत सामाजिक क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात थोरात यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
शीला दीक्षित यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी दीक्षित कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.